दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
कोळसा प्रदूषण व दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी जेटी येथे एकत्र येऊन गोव्यात कोळसा नकोच असा घोषणा दिल्या. कोळसा नको या मागणीसाठी कोणतेही राजकारण न करता प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केले.
लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा कोळसा गोव्यात नकोच अशी मागणी त्यांनी केली. माजी मंत्री मिलिंद नाईक यांनीही कोळसामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याने तो काढण्याची गरज व्यक्त केली.
येथे मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी व साठवण करण्यात येते. या कोळसा प्रदूषणामुळे सडा, जेटी, बोगदा व इतर परिसरातील रहिवाशीं हैराण झाले आहेत. कोळसा प्रदूषण होऊ नये यासाठी आम्ही निरनिराळे उपाययोजना व खबरदारी घेत असल्याचा दावा कोळसा हाताळणी कंपन्यातर्फे करण्यात येतो.
तथापी त्या दाव्यामध्ये काही तथ्य नसल्याचा प्रतिदावा रहिवासी करतात. गेल्या काही दिवसांपासून कोळसाच्या उग्र दुर्गंधीमुळे जेटी, बोगदा व इतर भागातील रहिवाशी हैराण झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर, नगरसेवक लिओ रॉड्रिग्ज, प्रजय मयेकर, रामचंद्र कामत, नगरसेवक दामू कासकर, दामू नाईक, जयेश शेटगावकर, शेखर खडपकर, नितीन चोपडेकर, निलेश नावेलकर, मृणाली पार्सेकर, मंजुषा पिळणकर, दयानंद नाईक, लिओ रॉड्रिग्जीस, रामचंद्र कामत, शेखर दाभोलकर, राजू यादव, संजय रेडकर, किस्तोद डिसोझा, सचिन भगत आदी उपस्थित होते.
प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या...
रहिवाशांना त्या कोळशाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी व प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. आरोग्यावर परिणाम करणारा कोळसा गोव्यात नकोच असे त्यांनी सांगितले. उपस्थितांनीही आम्हाला कोळसा नकोच असा घोषणा दिल्या