सावईवेरे : पुढारी वृत्तसेवा
वेरे-वाघुर्में ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री खामिणी मंदिर ते तळे-बोणये भागात आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता डांबरीकरणासह मधोमध खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबद्दल स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्री खामिणी मंदिराच्या मागील कुळागरातील आठ-दहा घरांसाठी या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन मीटर उंचीच्या काँक्रिटच्या संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला. दोन दिवसांपूर्वी मधोमध मोठ्या प्रमाणात माती खचल्याने डांबरीकरणाला तडे गेले.
कुळागराच्या बाजूची संरक्षक भिंत काहीशी कलंडल्याने त्या भागातून पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आलेला मातीचा भराव पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्ता खचल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम खात्यातर्फे कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने खचलेल्या भागातील माती हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही माती संरक्षक भिंतीलगत टाकण्यात आल्याने पावसाच्या पाण्याबरोबर ती कुळागरात पसरण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सदर रस्त्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण झाले होते.
त्यानंतर ४ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या आठ महिन्यांत खचल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून या कामाच्या चौकशीची मागणी होत आहे.