सांगे : पुढारी वृत्तसेवा
कावरे पिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रातील काजूर-बनखल येथील पुलाचे काम ना हरकत दाखल्यासाठी रखडले आहे. हा पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने पंचायतीचा ठराव आणि जमीन मालकाचा ना हरकत दाखला सादर करण्याचे सांगितले होते. मात्र, जमीन मालकांनी अद्याप ना हकरत दाखला सादर केला नाही. त्यामुळे पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे गेला नाही. असे असतानाही विनाकारण सरपंच, पंच आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांना बदमान केले जात आहे, असे स्पष्टीकरण कावरे पिर्ला सरपंच विधी वेळीप यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. विधी वेळीप पुढे म्हणाल्या की, गेल्या वर्षी कोणीतरी इथला व्हिडिओ काढून बातमी प्रसारित केली. त्यानंतर साबाखाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी पाहणी केली. यावेळी पंचायतीचा ठराव तयार करून प्रस्ताव द्या आणि त्यासोबत लाभार्थ्यांची स्वाक्षरीसह ना हरकत दाखला सादर करण्याचे सांगितले होते. त्यासाठी आम्ही संबंधितांना समजाविण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. वेळीप म्हणाल्या, संबंधित जमीन मालकांमध्ये अंतर्गत काहीतरी समस्या आहे. त्यामुळे ते एकत्र येत नाहीत. उलट आमच्यावरच आरोप करतात. हे पूल झालेच पाहिजे, अशी पंचायतीची आणि मंत्री फळदेसाई यांचीही भूमिका आहे. मात्र, ना हरकत दाखल्याशिवाय हे काम मार्गी लागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मंत्री फळदेसाई यांनी संबंधितांना आपल्याकडे घेऊन येण्यास सांगितले आहे. मात्र, ते लोकच त्यांच्यासमोर जायला तयार नसतील, तर आम्ही काय करणार, असेही त्या म्हणाल्या वेळीप म्हणाल्या, मंत्री फळदेसाई चांगले काम करत असूनही काही लोक त्यांना टार्गेट करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी कुशावती गावकर नामक एक महिलेची व्यथा समोर आल्यानंतर मंत्री फळदेसाई यांनी तिला १ लाख १२ हजार रुपयांची मदत मिळवून दिली. मात्रण तिच्या बँक खात्यात काहीतरी तांत्रिक चूक होती. हे सत्य असतानाही नाहक फळदेसाई यांच्यावर टीका करण्यात आली. वेळीप म्हणाले, २०१२ मध्ये जेव्हा फळदेसाई आमदार बनले, तेव्हा त्यांनीच यांना वीज मिळवून दिली होती. तरीही हे लोक म्हणतात की ते आमदारांकडे कधी गेलेच नाहीत. जेव्हा लोक आमदारांकडे जातात, तेव्हाच त्यांना समस्या समजतात आणि फळदेसाई लगेच कामे करतात पंच प्रदीप वेळीप म्हणाले, या पुलाचा विषय गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. तिथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आणि त्याच्या मुलांनीही सांगितले होते की त्यांना पुलाची समस्या आहे. मी त्यांना नेहमी सांगत
आलो आहे की तुम्ही एक ना हरकत दाखला द्या. पुढील काम आम्ही करून देऊ. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग हा प्रस्ताव आम्ही सरकार दरबारी कसा पाठवायचा, असा प्रश्नही त्यांनी विचारला
होय, आम्हीच कमी पडलो....
गावातील ८५ वर्षीय नागरिक बास्केलो जोरगो गावकर म्हणाले, बनखल येथे सात कुटुंबांचे वास्तव्य आहेत. सध्या चार घरे उभी आहेत. पैकी सध्या केवळ आपण, आपली पत्नी, पुत्र, सून व नातवंडे मिळून ७ जण राहतो. आमची ही स्वतःची जमीन असून शेती आहे. आपले दोन मुले दुसरीकडे राहतात. पावसाळ्यात आम्हाला पूल नसल्याने अडचण होते. त्यासाठी लाकडी साकव तयार करावा लागतो. आमचे दैवत इथे आहे. शिवाय सर्वांची शेती-भाती आहे. या साकवा पलीकडे दोन-तीन घरे आहेत. पण आधी तिथे सात घरे होती. पण आता रस्ता नाही, म्हणून लोक आजूबाजूला निघून गेले. पंचायतीने ना हरकत दाखला देण्यात आम्हीच कमी पडल्याचेही गावकर यांनी कबूल केले.