साळ : पुढारी वृत्तसेवा
साळ येथे रस्ता बांधकाम खात्यातर्फे रस्ता रुंदीकरण आणि हॉटमिक्स डांबरीकरणामुळे जी होती त ती बुजवली गेल्याने दर पावसाळ्यात रस्त्याला ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त होत असते. त्यामुळे प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना वाहन चालकांकडून भरधाव वाहनामुळे पाण्याचे शिंतोडे तर अंगावर पडून मनस्ताप सहन करावा लागतो.
रस्ता रुंदीकरणावेळी अधिक तर रस्त्यालगतच्या घरवाल्याने रस्त्याचे पाणी घरापर्यंत येऊ नये म्हणून रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंती बांधल्या असून पावसाच्या पाण्याचा सुलभतेने निचरा होत नाही. अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप दिसते. मधलावाडा तिठा, चंदगडकर यांच्या घरासमोर, दीपक परब यांच्या दुकानासमोर, मोहन राऊत यांच्या घरासमोर, श्री स्थलपुरुष मंदिरासमोर सुभाष परब यांच्या घरासमोर तसेच मुख्यत्वे मुसळधार पावसात मधलावाडा येथे यशवंत आत्माराम राऊत यांच्या घरासमोर रस्ता कुठचा आणि यशवंतराव यांच्या घराकडे जाण्यासाठी सुरक्षित वाट कोणती हा प्रश्न तिथे जाणाऱ्यांना किंवा त्या कुटुंबाला पडत असतो.
मुसळधार पावसात यशवंतराव यांच्या घरी जाण्यासाठी गुडघ्यावर पाण्यातून जावे लागते यावर उपाययोजना करण्यासाठी सतत गेली दहा वर्ष साळ सरपंच, ग्रामपंचायत साळ यांना अर्ज देऊन ग्रामपंचायतीने पाणी साचण्यावर, पाणी निचरावर कोणतीच उपाययोजना केली नाही. पाऊस आला की तिथे तळ्याप्रमाणे पाणी साचून राहते. पाणी साठल्यामुळे सरपटणारे प्राणी, विविध प्रकारच्या डासांची उत्पत्ती होऊन जीवितास धोका निर्माण होतो. जो बाल कल्याण आणि आरोग्यात खात्यातर्फे धोकादायक म्हणून यावर निर्माण होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीसाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे स्पष्ट सांगितले.
पाणी निचरा होण्याचा मार्ग बुजवला गेला
साळ मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोरीची व्यवस्था केली होती; पण रस्ता रुंदीकरणामुळे या मोरी मोडून पाणी निचरा होण्याचा मार्ग बुजवला गेला. पण नव्याने मोरी बांधल्याच गेल्या नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.
योग्य उपाययोजनांची मागणी
पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे वाट मिळेल त्या मार्गाने पाणी वाहून जाते याचा ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतो तरी गटार व्यवस्था, मोरीची सोय आणि यशवंत राऊत यांच्या घराजवळ पाण्याच्या समस्या बाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी साळवासीयांची मागणी होत आहे.