पणजी : पुढारी वृत्तसेवा
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पर्वरी उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाच्या अभियांत्रिकी कामकाजावर प्रश्न उपस्थित करताना रस्ते आणि पुलांची रचना करताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उड्डाणपुलावर पाणी साचण्याबरोबरच भरधाव वाहनचालक, वाहतूक नियंत्रण आणि लेन शिस्तीबाबतही खंवटे यांनी चिंता व्यक्त केली. या समस्यांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांच्याकडे हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी खंवटे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री कामत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन उड्डाणपुलाशी संबंधित समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच काही वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुचाकी वाहनांवर बंदी घातल्यानंतरही पाणी साचणे आणि वाहतूक सुरक्षेचे प्रश्न कायम असल्याने तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे मंत्री खंवटे यांनी म्हटले आहे.
उड्डाणपुलाच्या रचनेपासून देखभालीपर्यंत झालेल्या त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. भविष्यात पाणी साचण्याची पुनरावृत्ती होऊ नये तसेच वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.