मडगाव : शुक्रवारी सात दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या रिवण भागाच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. ज्या रस्त्यावर अमित नाईक यांच्यावर हल्ला झाला. त्याच रस्त्याने फळदेसाई काजूर येथे जाणार होते; पण ते रिवणच कार्यक्रम आटोपल्यानंतर, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अल्पोहारासाठी काही वेळ थांबण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन फळदेसाई थांबले नसते, तर या हल्ल्याचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडले गेले असते. फळदेसाई यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी रचलेले हे कारस्थान असून हा हल्ला की, हल्ल्याचा बनाव आहे, याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी सांगे भाजप मंडळाने पत्रकार परिषदेत केली आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपच्या सांगे मंडळाचे अध्यक्ष बायो भंडारी, मळकर्णेचे सरपंच राजेश गावकर उपस्थित होते. युट्युबर अमित नाईक यांच्याशी आपले कसलेच संबध नाहीत. सुभाष फळदेसाई यांना या प्रकरणात गोवण्यासाठी नाईक यांनी षडयंत्र रचले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून लोकांसमोर सत्य उघड करावे. हल्ल्यात सहभाग आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असे सरपंच राजेश गावकर यांनी सांगितले.
अमित नाईक यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर पाहिला. हा हल्ला मी व अभिजित देसाई यांनी केल्याचा आरोप करून आपणाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या घरी सात दिवसांचा गणपती होता. पूजा अर्चा सोडून त्याला मारहाण करण्यासाठी मी जाऊ शकतो, असा प्रश्न राजेश यांनी उपस्थित केला आहे. नाईक यांनी त्यांच्यावर झालेला हल्ला आणि घटनास्थळातून त्यांनी कसा पळ काढला. ज्या गाडीवर हल्ला करण्यात आला. ती गाडी कित्येक वर्षे बंद होती असे ते स्वतःच सांगत आहे. ऐरवी ते दुसऱ्याची गाडी घेऊन फिरतात. कालच त्यांनी आपली गाडी का बाहेर काढली. आपले व अभिजित देसाई यांचे त्यांनी नाव घेतले आहे. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.