फोंडा : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा अधिसूचित केल्याने सरकारला चांगली बुद्धी सूचली. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानण्यात येत असल्याचे 'उटा' संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन असल्याने फर्मागुडीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कटमगाळ दादाचे आशीर्वाद घेतल्यानंतर प्रकाश वेळीप बोलत होते. यावेळी आमदार गोविंद गावडे, तसेच उटाचे इतर नेते व प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकाश वेळीप म्हणाले, की सरकारने अधिसूचना काढली असली तरी आणखी दोन महत्त्वाचे टप्पे असून ती कार्यवाही त्वरित झाली तर येत्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींना राजकीय आरक्षण मिळू शकते.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत समाजाला आश्वस्त केल्यामुळे आदिवासी समाजाला हुरूप आला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, असे नमूद केले.
आमदार गोविंद गावडे म्हणाले, यांनी राजकीय आरक्षणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतलेले मुख्यमंत्री तसेच इतर सर्वांचे आभार मानून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
येत्या १३ रोजी पणजीतील आझाद मैदानावर आदिवासी महासभा होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. तोच धागा पकडून आदिवासी दिन कार्यक्रमात समाजाच्या जेन झी युवा कार्यकर्त्यांनी चलो पणजीचा नारा दिला. या कार्यक्रमाला सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे, तसेच उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गणेश गावकर यांनी युवा शक्तीचे कौतुक केले. या कार्यक्रमात मेघराज आकारकर, शशािकांत गावकर, श्रावणी गावडे तसेच अशिता गावडे व इतरांनी तडफदार भाषणे करताना येत्या १३ रोजी महासभेसाठी पणजी चलोचा नारा दिला. त्याला इतरांनी दुजोराही दिल्यामुळे पणजीतील महासभा अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.