पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरीवासीयांना नव्या सहापदरी उड्डाणपुलाचा वापर करायचे असेल, तर मेरशी जंक्शन येथे येऊन म्हापशाच्या दिशेने जावे लागेल अथवा गिरी येथे जाऊन पुलावरून मेरशी जंक्शन येथून पणजी शहरात जावे लागेल. त्यासाठी पुलाखालून जुन्या महामार्गावरून जाताना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागेल. यासाठी किमान १० ते १२ किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागणार आहे. म्हणजे नवा पूल सोयीऐवजी गैरसोयीचाच अधिक ठरणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.
पर्वरीतील उड्डाणपूल पर्वरीवासीयांसाठी सोयीचा ठरणार, असे सरकारच्या सांगण्यात येत होते. प्रस्तावित आराखडा आणि कामाच्या सुरुवातीपासून उद्घाटन होईपर्यंत असेच मानले जात होते. उद्घाटनानंतर दोन दिवसांनी पूल वाहतुकीसाठी खुला केला.
त्याला २४ तास उलटण्याआधीच झालेल्या कार-दुचाकी-डंपर अपघातात दोघांचा बळी गेला, तर दोघांवर गंभीर अवस्थेत इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघाताची दखल घेत सरकारने पुलावरून दुचाकींना बंदी केली. त्याचबरोबर पुलावरून सेवा रस्त्यावर जाण्यासाठी आणि सेवा रस्त्यावरून उड्डाणपुलावर येण्यासाठीचे मार्गही बंद केले. त्यामुळे पर्वरीतून म्हापसा अथवा पणजीच्या दिशेने वेळ वाचवून प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहनांचाही नकळत प्रवेश बंद झाला.
राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील या पुलाच्या पणजीकडील बाजूने निओ मॅजेस्टिक परिसरात महामार्गावरून बाहेर जाण्या-येण्याकरिता रस्ता ठेवण्यात आला होता. मात्र अपघातांनंतर तोही बंद करण्यात आला. त्यामुळे जर पर्वरीतील कोणालाही या उड्डाणपुलाचा वापर करावासा वाटला, तर त्याला जुन्याच रस्त्याचा वापर करत वाहतूक कोंडीचा सामना करत मेरशी जंक्शन येथे पोहोचावे लागेल, कारण तिथूनच अटल सेतूवर जाता येते. म्हणजे किमान १० ते १२ किलोमीटर अधिक प्रवास करावा लागेल.
पुलाच्या गिरीकडील भागामध्ये वाहनाचा वेग आवरण्यासाठी रंम्बलर घालण्यात आले आहेत. परंतु तिथे वाहनाचा वेग कमी करण्याऐवजी आहे त्याच अथवा त्याहून अधिक वेगाने वाहने हाकली जातात. दरम्यान, पुलावरून वाहतुकीसाठी दुचाकीला बंदी असली, तरीही काहीजण येथूनच जातात. परंतु जेव्हा निओ मॅजेस्टिक परिसरात येतात, तेव्हा बंद मार्ग दिसल्यावर बाहेर पडण्यासाठी दुभाजकावर वाहने चढविताना दिसत आहेत.
नव्या उड्डाणपुलामुळे पर्वरीतील व्यापारी वर्गाला लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु सर्वच वाहने गिरी येथून पुलावर जातात किंवा पणजीतील मेरशी जंक्शन येथून ती नवा मार्ग धरतात. म्हणजे पूर्ण पर्वरी ओलांडून ती थेट जातात.
पर्वरी बाजारपेठ पुलाखालील जुन्या मार्गाच्या बाजूने आहे. त्यामुळे येथून ये-जा करणारी वाहने ही कळंगुट मार्गाने येणारी अथवा परिसरातीलच असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान थांबून खरेदी करणाऱ्या वाहनांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे बाजारपेठेला म्हणावा तसा लाभ होताना सध्या तरी दिसत नाही.