Panaji agitation against Section 39A
पणजी : टीसीपी कायद्यातील कलम ३९ए रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेतली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२३) पणजीत राज्यभरातून आलेल्या नागरिकांचा संताप उसळला. आंदोलनाची तीव्रता वाढत गेली आणि हजारो आंदोलकांनी नगर व शहर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यात वादग्रस्त ठरलेल्या कलम ३९एअंतर्गत जमिनींच्या रूपांतरणाच्या मुद्द्यावर सकाळपासून पणजीसह विविध भागांत आंदोलने झाली. पणजी आणि सावर्डे येथे आंदोलनाची तीव्रता विशेष जाणवली. संध्याकाळी पणजीत झालेल्या महाआंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आरजीपीचे मनोज परब तसेच आम आदमी पक्षाचे व्हेंजी व्हिएगश यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
पणजीतील आझाद मैदान येथून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी दोनापावल येथील मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच केले. पोलिसांनी मार्गात अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रचंड संख्येने जमलेल्या आंदोलकांमुळे तो निष्फळ ठरला. काही आंदोलकांनी मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या मार्गे दोनापावल गाठले, तर इतरांनी मुख्य रस्त्याने पायी मोर्चा पुढे नेला. दोनापावल जंक्शनवर बॅरिकेड्स लावून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि तेथेच मोर्चा रोखण्यात आला.
यावेळी विविध नेत्यांनी कलम ३९ए तातडीने रद्द करण्याची मागणी करत जोरदार भाषणे केली. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडून संपूर्ण गोवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, संध्याकाळी आंदोलनासाठी गोव्याच्या विविध भागांतून निघालेल्या अनेक बसांना पोलिसांनी वाटेतच अडवले. त्यामुळे अनेकांना पणजीतील महाआंदोलनात सहभागी होता आले नाही. आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. तरीही विविध मार्गांचा अवलंब करून अनेक आंदोलक पणजीत दाखल झाले आणि महाआंदोलन पार पडले.