पणजी : पुढारी वृत्तसेवा
अलीकडेच झालेल्या पणजी महापालिकेच्या निवडणुकीत पारदर्शक मतदान झाले नाही, मतदारांच्या गुप्ततेचा भंग झाला. त्यामुळे या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आम्ही पणजीकर पॅनेलतर्फे महापलिका निवडणुकीविरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती पणजी येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पॅनेलचे प्रमुख उत्पल पर्रीकर यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक मिनीन डिक्रुझ व उमेदवार विष्णू नाईक उपस्थित होते. उत्पल पर्रीकर म्हणाले की, महापालिका निवडणूक ईव्हीएमद्वारे न घेता बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आली आणि बॅलेट पेपरच्या दोन जागी जे क्रमांक नोंद होते; ते मतदारांची ओळख जाहीर करणारे होते.
ज्यामुळे मत नेमके कोणी कुणाला दिले ते कळण्यास वाव निर्माण झाला आहे. हे मतदारांच्या हक्काचे हनन असून जिल्हा न्यायालयाने यावर फोंडा पोटनिवडणुकीच्या धर्तीवर निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
फोंडा पोटनिवडणूक रद्द प्रकरणी विचारले असता पर्रीकर म्हणाले निवडून येणाऱ्या आमदारांना एक वर्ष मिळायला हवे, हा नियम निवडणूक आयोगाला माहीत होता; तरी त्यांनी निवडणूक जाहीर कशी केली? न्यायालयाने कायद्यानुसार ही निवडणूक रद्द केली. आता काहीजण आक्षेप कसे घेतात ? आगामी पालिका निवडणूक पारदर्शक व्हावी, असेही ते म्हणाले. अनेकांच्या प्रभागांत नको ते बदल करण्यात आले, असे मिनीन डिक्रुझ म्हणाले.
याचिकेवर आज सुनावणी
मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचा दावा करत अॅड. विष्णू नाईक यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी १० एप्रिल रोजी दुपारी २.३० वा. ठेवली आहे. याचिकेत गोवा राज्य निवडणूक आयोग तसेच नवनिर्वाचित ३० नगरसेवकांना प्रतिवादी केले आहे. ही निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकादाराने केली आहे. त्यांनी अंतरिम आदेशाची विनंती केल्याने त्यावर ही सुनावणी होणार आहे.