पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्रीपदासाठी आपण कधीही कोणाकडे मागणी केली नाही किंवा त्यासाठी आग्रह धरला नाही. सार्वजनिक जीवनातील काम, समर्पण आणि पक्षावरील निष्ठेमुळेच आपल्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्था आणि डॉ. ईशान शिवानंद यांच्या शिवयोग फाउंडेशन यांच्यात गुरुवारी बांबोळी येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक गुरू, संशोधक आणि 'कंपॅशन युनायटेड्स'चे संस्थापक डॉ. ईशान शिवानंद उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च शिवयोग फाउंडेशन उचलणार असून यातून मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांची सामाजिक बांधिलकी यातून दिसून येते. देशाच्या सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन, योग, आयुर्वेद आणि सनातन मूल्यांच्या प्रसारासाठी होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.
या सामंजस्य करारामुळे भारतीय पारंपरिक ज्ञानप्रणाली आणि आधुनिक वैज्ञानिक पद्धती यांचा संगम साधत विद्यार्थी व युवकांमध्ये भावनिक लवचिकता, तणाव व्यवस्थापन, सजगता आणि सर्वांगीण मानसिक आरोग्य विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
या कराराअंतर्गत राज्यभरात तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक लवचिकता विकसित करण्यासाठी संरचनात्मक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. ईशान शिवानंद यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय ज्ञान परंपरेचे संवर्धन, मंदिरांचा जीर्णोद्धार, सांस्कृतिक वारशाचे डिजिटलायझेशन आणि भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) बळकट करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. गोवा हे केवळ पर्यटनाचे नव्हे, तर आत्मशोध आणि आध्यात्मिक जागृतीचे केंद्र असल्याचेही डॉ. शिवानंद म्हणाले.