पणजी : भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटस्ची संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेली वैधानिक संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेतर्फे देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरचा लेखा सुधारणेसाठीचा पुरस्कार दक्षिण गोव्यातील दवर्ली पंचायतीला मिळाला आहे. नवी दिल्ली येथील संघटनेच्या जागतिक परिषदेत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि संघटनेचे अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत सरपंच श्याम राजाध्यक्ष आणि सचिव प्रदीप ताम्हणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामपंचायत श्रेणीमध्ये ही प्रतिष्ठित मान्यता मिळवणारी दवर्ली पंचायत ही भारतातील एकमेव पंचायत ठरली आहे. राष्ट्रीय स्तरावर 2024-25 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखा सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी दवर्ली ग्रामपंचायतीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि पंचायत संचालनालय प्रशासनाने या पंचायतीचे अभिनंदन केले आहे.