पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा आणि सोलापूर दरम्यान थेट रेल्वे जोडणीची गोव्याची दीर्घकाळापासूनची मागणी मान्य करून या मार्गावर रेल्वे सुरू करावी. थेट रेल्वे सेवा सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची तपासणी करावी, शक्यतो मडगाव सावर्डे, कोल्लम हुबळी गदग बागलकोट विजयपूर सोलापूर मार्गे ही रेल्वे सुरू करावी,
अशी मागणी गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन केली. तसेच गोव्यातील रेल्वे संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
तानावडे यांनी गोव्याला देशभरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडणारे अतिरिक्त थेट आणि सोयीस्कर रेल्वे मार्ग शोधण्याच्या गरजेवरही चर्चा केली. कनेक्टिव्हिटी सुधारून आणि प्रवाशांना गाड्या बदलण्याची गरज कमी करून या गाड्या सुरू व्हाव्यात, असे तानावडे म्हणाले.