पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी राज्य हरित आणि स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन उत्तर गोवा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५ जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यभर दहा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला आहे.
या उपक्रमांतर्गत उगवे-तोरसे परिसरात खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. या कार्यक्रमाला पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप पेडणे मंडळ अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर भाजप सरचिटणीस उषा नागवेकर, माजी नगराध्यक्षा तृप्ती सावळ-देसाई, आनंद सावळ-देसाई, रमेश सावळ, माजी सरपंच प्रार्थना मोठे, छाया नाईक, सरपंच पूजा साठेलकर, मोपा सरपंच सुबोध महाले, पंच रमेश बुटे, विजय तोरस्कर, वसंत शेट्ये, सदाशिव शेट्ये, परवेज खतीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार तानावडे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला दहा लाख वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार, लोकप्रतिनिधी, सरपंच, पंच, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या माध्यमातून पेडणे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाढते जागतिक तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंग ही चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. देश-विदेशातून गोव्यात येणारे पर्यटक केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नव्हे, तर येथील हिरवाई आणि स्वच्छ वातावरणासाठीही आकर्षित होतात. त्यामुळे 'ग्रीन गोवा' आणि 'स्वच्छ गोवा' घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात गोव्याला 'गार्डन सिटी' आणि 'हरित गोवा' अशी नवी ओळख निर्माण करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत 'एक पेड माँ के नाम' आणि 'हरित गोवा, स्वच्छ गोवा' अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा घाला : आर्लेकर
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण करून या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे. पेडणे मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी फळझाडे, फुलझाडे तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.
केवळ वृक्ष लागवड करून थांबून चालणार नाही, तर त्या झाडांची योग्य निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्याच्या प्रवृत्तीला आळा घालून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.