म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांसाठी नारळाचे पीक महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांपासून नारळ काढण्यासाठी पारंपारिक 'पाडेली' (नारळ काढणारे कामगार) मिळणे कठीण झाले आहे. वेळेवर काढणी न झाल्याने नारळ वाया जाणे, बागेला कीड लागणे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या.
यावर तोडगा काढण्यासाठी कृषी विभाग, आत्मा उत्तर गोवा आणि बार्देश कृषी कार्यालयाच्या वतीने म्हापसा येथे झाडावर चढणाऱ्या एका आधुनिक मोटारयुक्त यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे यंत्र जुन्या मॅन्युअल किंवा पेडल मारणाऱ्या साधनांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यामध्ये लहान इंजिन बसवलेले असून, त्यामुळे हे यंत्र झाडावर सहज चढते.
शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम आणि वेळ या दोन्हीची मोठी बचत होणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी नागेश कोमरपंत आणि प्रसन्न कुमार यांनी स्पष्ट केले की, हे यंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची काटेकोर तपासणी केली जात आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून या यंत्रावर सरकारी अनुदान देण्याचा किंवा संस्थांमार्फत भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.