पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोरजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील विविध नागरी समस्यांवरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला जाब विचारला. पार्किंग व्यवस्था, गटारांची स्वच्छता, रस्त्यावरील अतिक्रमणे, किनारी भागाकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा अडवणे, बेकायदा जाहिरात फलक, बोअरवेल, सीसीटीव्ही कॅमेरे, वाढलेली झाडे-झुडपे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव तसेच मजुरीचे दर आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
सरपंच विलास मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला उपसरपंच सुप्रिया पोके, पंच सदस्य सुरेखा शेटगावकर, भजनी शिरोडकर, मंदार पोके, फटू शिरगावकर, पवन मोरजे, स्वप्नील शेटगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी सरपंचांनी उपस्थितांचे स्वागत केले.
तुकुराम शेटगावकर यांनी विविध समस्यांवर आठ लेखी प्रश्न उपस्थित केले.
गटार स्वच्छतेवर पंचायत किती खर्च करते, रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे हटवण्यासाठी किती निधी खर्च झाला आणि रस्त्यावरील अतिक्रमणांवर काय कारवाई करण्यात आली, अशी माहिती त्यांनी मागितली. पंचायत क्षेत्रातील बेकायदा बोअरवेलचे सर्वेक्षण करून त्या सील करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
पंचायत क्षेत्रात बांधलेल्या लहान साकवांची संख्या व त्यावरील खर्च, झाडे कापण्यावरील खर्च आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या, त्यातील कार्यरत कॅमेरे व त्यावरील खर्चाचा तपशीलही ग्रामसभेसमोर ठेवण्याची मागणी करण्यात आली. अनाधिकृत जाहिरात फलकांमधून पंचायतीला मिळणाऱ्या महसुलाबाबतही प्रश्न उपस्थित झाला.
धनंजय शेटगावकर यांनी मजूर व कामगारांकडून कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे आणि मनमानी दर आकारले जात असल्याचा मुद्दा मांडला. पंचायतीने मजूर व कामगारांना एकत्र बोलावून चर्चा करावी आणि योग्य दर आकारणीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर सरपंच विलास मोरजे यांनी संबंधितींशी चर्चा करून योग्य सूचना देण्याचे आश्वासन दिले.
गावातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रवही चर्चेत आला. किनारी भाग आणि मुख्य रस्त्यांवर रात्री कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून नियमानुसार उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
सोनू शेटगावकर यांनी पाळीव श्वानांची पंचायत स्तरावर नोंदणी करून त्यासाठी शुल्क किंवा कर आकारण्याबाबत विचार करण्याची सूचना केली. यावेळी सुभाष शेटगावकर, विपुल शेटगावकर, घनःश्याम मोरजकर, अमित शेटगावकर, रजत शेटगावकर आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले.
ग्रामस्थांनी समस्यांवर ठोस व कालबद्ध उपाययोजना करण्याची मागणी केली. सरपंच विलास मोरजे यांनी पंचायत स्तरावर शक्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पंच मंदार पोके यांनी आभार मानले.
पर्यटनामुळे वाढलेल्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोरजीत शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनधिकृत फलकांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणले. किनारी भागाकडे जाणाऱ्या पारंपरिक वाटा अडविल्या जात असल्याच्या तक्रारींची पाहणी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.