मडगाव : पुढारी वृत्तसेवा
झुआरी नदीवरील प्रस्तावित मिराबाग बंधारा प्रकल्पाच्या कामावरून सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. शासनाने या कामाबाबत हात वर केल्याचा आरोप करत आंदोलकांनी कंत्राटदार मनोज दुकळे तसेच मेसर्स लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात कुडचडे पोलिस स्थानकात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, बंधाऱ्याच्या कामाच्या नावाखाली खासगी मालमत्ता व सार्वजनिक रस्त्याचे नुकसान करण्यात आले आहे. पहिल्या तक्रारीत सर्व्हे क्रमांक ३/३ मधील खासगी जमिनीवर मालकाची परवानगी न घेता उत्खनन केल्याचा आरोप कंत्राटदाराविरोधात करण्यात आला आहे. अनधिकृत खोदकाम 1 प करून अतिक्रमण व मालमत्तेची हानी केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
दुसऱ्या तक्रारीत पाइपलाईन टाकण्यासाठी मिराबाग परिसरातील रस्ता खोदण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप कंपनीविरोधात करण्यात आला आहे. आवश्यक परवानग्यांविषयीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत संबंधितांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुडचडे पोलिस निरीक्षक मेल्वीन कुलासो यांनी तक्रारींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मिराबाग येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्पाला गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांचा तीव्र विरोध सुरू आहे. या प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, नदीपात्राची नैसर्गिक रचना तसेच पूरस्थितीचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आवश्यक परवानग्या, जमीन प्रक्रिया आणि पर्यावरणीय परिणामांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ७आंदोलन, ठिय्या व निवेदने देण्यात आली आहेत. कामे सुरू करण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ग स्थानिकांची संमती घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून सातत्याने होत आहे. तक्रारींमुळे मिराबाग बंधारा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, काँग्रेस गटाध्यक्ष संकेत भंडारी यांनी प्रस्तावित बंधाऱ्यामुळे भंडारी समाजातील सुमारे ५०० घरे धोक्यात येणार असल्याचा दावा केला.