पणजी : पुढारी वृत्तसेवा
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मराठीप्रेमींची ८० टक्के मते खाऊन, मराठी मतांना गृहीत धरून, मराठीशीच गद्दारी करीत मराठीच्या जिवावर उठलेल्या सत्ताधाऱ्यांबाबत यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय गोव्याच्या सर्व प्रखंडांतून जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या धोरणात्मक बैठकीत एकमताने घेण्यात आला.
फोंडा येथील किड्स नेस्ट संस्थेच्या सभागृहात बैठक झाली. राज्यातील १८ प्रखंडातील विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला व्यासपीठावर राज्य नियंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, भारतमाता की जय संघाचे राज्य संघचालक गोविंद देव, राज्य मातृशक्तीप्रमुख डॉ. प्रा. अनिता तिळवे व केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे अशोक नाईक उपस्थित होते.
मार्च, २०२५ पासून गेले १६ महिने मराठी राजभाषा निर्धार समितीच्या बॅनरखाली लोकशाही मार्गाने, मोठ्या जनप्रतिसादानिशी मेळावे, धरणे, बैठका, जागृती अभियान, मिरवणुका, स्वाक्षरी अभियान, समाजातील प्रतिष्ठितांची एकत्रीकरणे, मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री व पक्ष उच्चपदस्थांच्या भेटी व निवेदने आणि प्रमुख शहरात जाहीर सभा घेऊनही या उपक्रमांना आमदार अथवा पक्ष पदाधिकाऱ्याने प्रकट प्रतिसाद दिला नाही किंवा ना मराठी राजभाषा मागणीसंदर्भात तोंड उघडले, याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी प्रकट केली.
आपआपल्या मतदारसंघातील आमदारांसह आमदारांची भेट घेऊन केवळ निवेदन नव्हे, तर मतदारांचे निर्वाणीचे मागणी पत्र येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत या भेटी होतील.
३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या अधिवेशनात, मराठी भाषेला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा देणारा ठराव सत्ताधारी पक्षाने संमत करावा, असा वैयक्तिक दबाव आमदाराने आणून तसा ठराव येत्या अधिवेशनातच पारित करावा आणि त्यानुसार राजभाषा कायद्यात आवश्यक दुरुस्ती, येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी करून घ्यावी, अशी मागणी या मागणीपत्रात आमदाराला करण्यात येणार आहे.
यातून योग्य काही निष्पन्न न झाल्यास ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी म्हणजे विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर मराठीप्रेमींचा मोर्चा काढण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला.
बैठकीचा प्रारंभ मराठी असे आमची प्रिय माता या सांघिक गीताने झाली. तत्पूर्वी आतापर्यंत झालेल्या उपक्रमांची एक चित्रफित, माहितीसह दाखवण्यात आली. ढवळीकर यांनी स्वागत व प्रस्तावना केली. नंतरच्या बैठकीची सूत्रे वेलिंगकर यांनी सांभाळली.
स्वाक्षरी अभियानाचा आढावा प्राचार्य संदीप पाळणी यांनी घेतला. आतापर्यंत हाती आलेल्या सह्यांच्या तक्त्यांनुसार आपण २ लाख सह्यांचा आकडा पार करून अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल चालू आहे, अनेक ठिकाणचे तक्ते अजून गोळा व्हायचे आहेत, अशी माहिती पाळणी यांनी दिली. आपले ५ लाख सह्यांचे उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टीने, अनेकांनी, अजून मुदतवाढीची मागणी बैठकीत केल्यामुळे, ऑगस्ट ३१ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली.