Goa GMC Bambolim 
गोवा

Goa GMC Bambolim| "उपचारातील दिरंगाईमुळे 21 वर्षीय युवकाचा 'ब्रेन डेड'!; जीएमसीमध्ये 6 तास उपचार न मिळाल्याचा माळी कुटुंबीयांचा आरोप"

Goa GMC Bambolim| गोव्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. कुडतरी येथील २१ वर्षीय रमेश माळी हा उपचारातील कथित दिरंगाईमुळे ब्रेन डेड झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. कुडतरी येथील २१ वर्षीय रमेश माळी हा उपचारातील कथित दिरंगाईमुळे ब्रेन डेड झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातून गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), बांबोळी येथे हलविल्यानंतर तब्बल सहा तास उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावल्याचा दावा कुटुंबीयांनी करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश माळी याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर येथील डॉक्टरांनी आवश्यक तज्ज्ञ उपचार व सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत त्याला पुढील उपचारासाठी जीएमसीमध्ये रेफर केले.

गंभीर रुग्ण असल्याने तिथे पोहोचताच त्वरित उपचार सुरू होतील, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, जीएमसीमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास सहा तास उपचार सुरू झाले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या विलंबामुळे रमेशची प्रकृती अधिकच गंभीर झाली. रविवार असल्याने संबंधित विभागात केवळ एकच डॉक्टर कार्यरत होता. त्यामुळे आपत्कालीन विभागात दाखल झालेल्या गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत, असा दावा नातेवाईकांनी केला.

सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांची कमतरता आणि अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, एका प्रभावशाली व्यक्तीच्या हस्तक्षेपानंतरच रमेशला अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मेंदूला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

वेळेत उपचार मिळाले असते, तर ही परिस्थिती टाळता आली असती, असा त्यांचा दावा आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी राज्य सरकार आणि आरोग्य खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

"दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्यक सुविधा नाहीत आणि जीएमसीमध्येही वेळेत उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी कोणावर विश्वास ठेवायचा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपानंतरच रुग्णांना तातडीची सेवा मिळते, असा आरोपही त्यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT