Goa  
गोवा

Madgaon News | तळसाझरमध्ये परप्रांतीयांचे अतिक्रमण

Madgaon News | गांजा ओढणाऱ्या, दारूड्यांकडून जागेचा वापर; रात्रीच्या अंधारात होताहेत प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

औषधी गुणांनी पिढ्यान्पिढ्या मडगावकरांचे आरोग्य जपणारी ऐतिहासिक तळसाझर आज परप्रांतीयांचे अतिक्रमण, व्यसनाधीनतेचा विळखा आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे गांजादारूचे अड्डे म्हणून कुप्रसिद्ध होत चालली आहे.

कधीकाळी श्रद्धा, आरोग्य आणि संस्कृतीचे प्रतीक असलेली ही तळी आता रात्रीच्या अंधारात मद्यपी आणि ड्रग्ज ओढणाऱ्यांचे खुले नंदनवन बनली आहे. रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या परिसरातील, विशेषतः मोती डोंगर येथील व्यसनी युवकांचे घोळके या ठिकाणी जमून खुलेआम बिंगाणा घालत असतात, तळीला लागून असलेल्या खोलीत गांजा ओढण्यासाठी वापरले जाणारे जॉइंट पेपर्स, अंतर्वस्त्रे आणि दारूच्या बाटल्यांचा खच साचलेला असून, हे दृश्य पाहून कोणाच्याही संतापाचा उद्रेक होईल.

कळस म्हणजे, औषधी गुण असलेल्या या पवित्र तळीकडे परप्रांतीय भाडेकरू नैसर्गिक विधी करत असल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गैरप्रकारांना जाब विचारण्याची हिंमतही स्थानिक नागरिकांमध्ये उरलेली नाही, कारण गुंडगिरी आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या तळसाझरला असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व झपाट्याने कमी होत चालले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ग्रामस्थ विवेक नाईक यांनी व्यक्त केली. रोज रात्री अप रात्री युवकांचे टोळके येथे जमतात, धिंगाणा घालतात, पण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणी पुढे येत नाही.

असेही त्यांनी सांगितले. आरोग्य, श्रद्धा आणि इतिहासाचा संगम असलेली मडगावची तळसाझर वाचवायची की व्यसनाधीनतेच्या विळख्यात सोडून द्यायची, हा सवाल आता तीव्रपणे उपस्थित होत आहे. तातडीने पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही, अतिक्रमण हटवणे आणि कडक कारवाई झाली नाही, तर तळसाझरचा इतिहास केवळ पुस्तकातच उरेल, अशी संतप्त भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

संवर्धनाची गरज :

बारेटो नगरसेवक कमिल बारेंटो यांनी दै. 'पुढारी' जवळ बोलताना वाढलेल्या लोकवस्तीमुळे तळसा झरीचे पाण्याला औषधीय गुण राहिलेला नाही, असे माहिती दिली. भाजपच्या टीमने अनेक वेळा तळ साझरीची साफसफाई केली आहे. पूर्वी दूदूरवरून लोक येथे आंघोळ करण्यासाठी येत होते. तीन दिवस वरीच्या पाण्याने स्नान केल्यानंतर त्वचेचे विकार दूर होत होते. आता प्रदूषणामुळे या ठिकाणी कोणीही फिरकत नाही या झारीचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे, असे कामिल बारेंटो यांनी सांगितले.

सुशोभीकरण केले मात्र...

हल्लीच मडगावचे आमदार तथा मंत्री दिगंबर कामत यांनी तळसाझरवरील मोडकळीस आलेले बांधकाम दुरुस्त करून झरीचे सुशोभीकरण केले होते. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून, सगळे प्रयत्न वाया गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT