पणजी: डेंग्यू व किंवा मलेरियासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांना मच्छर अगरबत्त्या पळवून लावतात अशी सर्व लोकांची धारणा आहे. मात्र नियमांचे पालन न करता तयार करण्यात येणाऱ्या अनधिकृत मच्छर अगरबत्त्यांचाच आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असा हा निष्कर्ष होग इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए) या संस्थेच्या एका अभ्यासातून निघाला आहे.
भारतात घरगुती कीटकनाशकांचा सुरक्षित वापर वाढवण्यासाठी काम करणारी ही ना-नफा तत्त्वावरील संस्था आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या (16 मे) निमित्ताने संस्थेच्या वतीने एक सविस्तर सार्वजनिक आरोग्यविषयक अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 95 टक्के कुटुंबांनी गेल्या वर्षभरात आपल्याला मलेरिया किंवा डेंग्यूसारखे डासांमुळे होणारे आजार झाले नाहीत असे सांगितले असले तरी मंजुरी नसलेली रसायने घातलेल्या बेकायदेशीर मच्छर अगरबत्त्या या “माणसाच्या श्वसनसंस्थेसाठी मोठा धोका आहेत, असे मत सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 70 टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले,
तसेच या अगरबत्त्यांमुळे होणारा आरोग्यधोका हा सिगारेटच्या धुुरामुळे होणाऱ्या थोक्याइतकाच गंभीर आहे, असे 60 टक्के डॉक्टरांनी म्हटले आहे. हे सर्वेक्षण 12 शहरांमध्ये नुकतेच करण्यात आले. यामध्ये 1,264 कुटुंबे आणि 405 डॉक्टरांचा सहभाग होता. फुफ्फुसरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज, सर्वसाधारण वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ अशा अनेकांनी या सर्वेक्षणासाठी आपली मते नोंदवली.