हरमल : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचे आगमन होऊन शेती हंगामाला सुरुवात होत असते. मात्र, यंदा हवामान खात्याचा अंदाज काहीसा फोल ठरल्याचे चित्र दिसत आहे. जून महिन्याच्या मध्यावरही रखरखीत उन्हाचा तडाखा कायम असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
शेतीची कामे कशी आणि केव्हा सुरू करावीत, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत अवघा दीड ते दोन इंच पाऊस झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाळ्यासारखे वातावरण असल्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे. सततच्या कडक उन्हामुळे भूमी करपली असून शेती हंगाम नेमका कधी सुरू होणार, पिकांची लागवड केव्हा होणार आणि कापणीपर्यंत पाण्याची उपलब्धता राहणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाईची शक्यता अधिक गडद होत असून त्यावर उपाययोजना कशा कराव्यात, हा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. अनेक विहिरींची पाणीपातळी खालावली असून काही विहिरी कोरड्याही पडल्या आहेत.
काही ग्रामस्थांच्या मते, अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या बोअरवेलमुळेही जलस्रोतांवर परिणाम होत आहे. विहिरींना पाणीपुरवठा कमी होत असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.