Goan Theatre Actress Sanjana Thaku 
गोवा

Goan Theatre Actress Sanjana Thakur | रंगभूमीची समर्पित साधक : संजना ठाकूर

Goan Theatre Actress Sanjana Thakur | मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि समाजप्रबोधनाचा सशक्त वारसा जपणारी कला आहे.

पुढारी वृत्तसेवा

निवृत्ती शिरोडकर : पुढारी वृत्तसेवा

मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि समाजप्रबोधनाचा सशक्त वारसा जपणारी कला आहे. या रंगभूमीवर अनेक महिला कलाकार आपल्या कलेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. कुटुंब, समाज आणि व्यावसायिक आयुष्य यांचा समतोल साधत अभिनयाची आवड जपणाऱ्या अशाच गुणी नाट्यस्त्री कलाकार संजना ठाकूर यांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे.

शालेय जीवनात छोट्या-छोट्या नाटिकांमधून अभिनयाची पहिली पायरी चढताना शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले आणि रंगभूमीशी तिचे अतूट नाते जुळले. नाट्यस्पर्धांमधील यश, प्रेक्षकांकडून मिळालेली दाद आणि व्यावसायिक नाटकांमधील संधी यांनी तिच्या कलाप्रवासाला नवी दिशा दिली. "काही तरी घडतंय बघा" या व्यावसायिक नाटकापासून सुरू झालेली ही वाटचाल आज अनेक संस्मरणीय भूमिकांपर्यंत पोहोचली आहे.

रंगमंच त्यांच्यासाठी केवळ अभिनयाचे व्यासपीठ नाही, तर समाजाशी संवाद साधण्याचे आणि सकारात्मक संदेश देण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास, नियमित तालमी, शिस्तबद्ध काम, मेहनत आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड यामुळे तिचा अभिनय अधिक प्रभावी झाला आहे. "माझ्या सासरच्या मंदिरी" सारख्या भूमिकांमधून तिने रसिकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

संजना ठाकूर यांचा जन्म हरमल येथे झाला. त्यांनी अनेक नाटकांमधून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. काहीतरी घडतं इथं, घडली मला अश्रू फुलांची, देवा घरचा न्याय, साक्षात्कार, माझ्या सासरच्या मंदिरी, निराधार, उद्धार, आई कुठे शोधू तुला, गौरीशंकर, तडीपार, अखेरचे अश्रू, मंदिर मला न्याय हवाय, अखंड नाते रक्ताचे, रक्ताचे चुडे, वेडी माया, डाव, बळी, राखणदार, विधीचक्र, आमराई, शिर्डी माझे पंढरपूर, महिमा साईचा, अमरधाम, दैवी संकेत, आई कुणा म्हणू मी, विश्वासघात, तुफान, फरारी, अमरदान, कालभैरव, कडेलोट, हिरवा चुडा, नको जाळू माझं घरटं, शिखर,

जन्मदाता, तो मी नव्हेच, देव माणूस, चांदणी शिंपीत जा, रामची ताई, संशय कल्लोळ, सूर राहू दे, वेगळं व्हायचंय मला, कधीतरी कुठेतरी, देव्हारा, मत्स्यगंधा, पंढरपूर, सुवर्णसुंदरी, संत तुकाराम, गीता गाती ज्ञानेश्वर, रायगडाला जेव्हा जाग येते, शंभूराजे, ययाती-देवयानी, सत्यविजय, प्रतिवर्तीचा प्रताप, जय जय गौरीशंकर, सिंहगर्जना, राजधर्मनिष्ठा, माते तुला काय हवंय, संत गोरा कुंभार, स्वयंवर, अमृत मोहिनी, सौभद्र, सिंहाचा छावा, भाव तुची देवा अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

स्त्री कलाकार म्हणून काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कुटुंब आणि रंगभूमी यांचा समतोल राखणे, वेळेचे व्यवस्थापन, सामाजिक जबाबदाऱ्या आणि सुरक्षिततेची जाणीव या सर्व गोष्टी सांभाळत त्या आपला कलाप्रवास यशस्वीपणे पुढे नेत आहेत. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आणि स्वतःचा आत्मविश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे. सोशल मीडियाच्या युगातही प्रत्यक्ष नाटकाचे महत्त्व कायम असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे.

कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद, जिवंत भावना आणि स्थानिक संस्कृतीचे जतन ही रंगभूमीची खरी ओळख असल्याचे त्या मानतात. अभिनयाबरोबरच गायन, ग्रंथवाचन, आध्यात्मिक साहित्याचा अभ्यास आणि लेखन हे त्यांचे आवडते छंद असून वसंत कानेटकरांसारख्या दिग्गज नाटककारांचे साहित्य त्यांना प्रेरणा देतात, असे त्या सांगतात. समाजसेवक रुपेश नार्वेकर यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या संजना ठाकूर नव्या पिढीतील कलाकारांना कलेवर निस्सीम प्रेम करावे, शिस्त पाळावी, सतत शिकत राहावे आणि यशासाठी संयम ठेवावा, असा मोलाचा संदेश देतात. संजना ठाकूर सांगतात, शालेय जीवनात छोट्या-छोट्या नाटिकांमधून त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली.

शाळेतील संजय हरमलकर सर विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांमध्ये आणि नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी करून घेत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळेच आपल्या मनात अभिनयाची आवड निर्माण झाली, असे त्या नमूद करतात. बालपणीचा एक प्रसंग त्या आवर्जून सांगतात. एका नाट्यस्पर्धेत सहभागी झाल्यानंतर निकाल जाहीर होत असताना त्यांचे नाव प्रथम तीनमध्ये घोषित झाले आणि द्वितीय पारितोषिक मिळाले.

तो क्षण अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय होता. त्या यशामुळे अभिनयाविषयीची ओढ अधिक वाढली आणि रंगभूमीकडे अधिक आकर्षण निर्माण झाले. 'काही तरी घडतंय बघा' हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक ठरले. त्यात छोटासा रोल मिळाला असला तरी प्रेक्षकांनी केलेले कौतुक आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली. अभिनयाच्या क्षेत्रात येताना कुटुंबाचा मोठा आधार मिळाल्याचे त्या सांगतात. आई-वडील आणि बहिणी यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आत्मविश्वासाने या क्षेत्रात पुढे जाता आले.

भूमिकेची तयारी करताना त्या पात्राचा सखोल अभ्यास करतात. संवाद, तालमी आणि दिग्दर्शकांच्या सूचनांवर भर देऊन भूमिका अधिक प्रभावी करण्याचा त्या प्रयत्न करतात. स्त्री कलाकार म्हणून काम करताना कुटुंब आणि काम यांचा समतोल राखणे, वेळेचे नियोजन आणि सामाजिक जबाबदाऱ्या ही आव्हाने असली तरी आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ती पेलता येतात. सोशल मीडियाच्या युगातही नाटकाचे महत्त्व कायम असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद आणि जिवंत भावना हे नाटकाचे खरे वैशिष्ट्य असल्याचे त्या सांगतात.

रंगमंचावरील एका प्रसंगात सहकलाकाराचा संवाद विसरल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखून नाटक सुरळीत पुढे नेले, हा अनुभव त्या आठवणीने सांगतात. अशा प्रसंगांमुळे कलाकार अधिक सक्षम होतो, असे त्या मानतात. समाजसेवक रूपेश नार्वेकर हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यातून समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा मिळते. नवीन कलाकारांना त्या कलेवर प्रेम करावे, शिस्त पाळावी, सतत शिकत राहावे आणि संयम ठेवावा, असा सल्ला देतात.

माझ्या सासरच्या मंदिरी'ने दिली ओळख

रंगभूमीबद्दल त्या म्हणतात की, रंगमंच हे त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. प्रत्येक भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्याची आणि सकारात्मक संदेश देण्याची इच्छा असते. पडदा उघडण्यापूर्वी उत्सुकता, जबाबदारी आणि आत्मविश्वास यांचे मिश्रण मनात असते. 'माझ्या सासरच्या मंदिरी' ही भूमिका त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरली. या भूमिकेमुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि कलाकार म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT