हरमल : हरमल येथे लग्नसोहळ्यानंतर आहेराची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये अंदाजे ८ तोळे वजनाचा सोन्याचा हार, अंगठी, मोबाईल व आहेर पाकिटे मिळून अंदाजे २० लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली.
दरम्यान, या चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हरमल येथील नाईक कुटुंबातील लग्नसोहळ्यात हा प्रकार घडला. दुपारी खानपान झाले होते, स्वागत समारंभ सुद्धा झाला व अवघेच फोटो सेशन चालू होते. यावेळी आहेर सांभाळणारी व्यक्ती बॅग ठेऊन फोटोसाठी सज्ज झाली व डोळ्याचे पाते लवते तोच अचानक एकजण आला आणि आहेराची बॅग घेऊन चालता झाला. हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.
काही वेळानंतर आहेराची बॅग गायब झाल्याचे लक्षात आल्यानंत एकच धावपळ उडाली. सीसीटीव्ही कॅमेरे पाहून सदर चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न झाला. फुटेज मिळाले मात्र, ते अंधुक दिसत असल्याने अखेरची आशा फोल ठरली. मांद्रे पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, हाती काहीच लागले नाही. नेपाळी सारखा दिसणारा व्यक्ती, हॉलमध्ये चांगल्या पेहराव्यात होती व दुचाकी घेऊन बाहेर थांबलेला, त्याचा साथीदार किंचित गबाळा होता. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.