दोन वर्षांत एकूण १,६३,३४८ प्रकरणांची नोंद
२०२४ मध्ये ७३,६५२, तर २०२५ मध्ये ८९,६९६ गुन्हे नोंद
दोन वर्षांतील आकडेवारी चिंताजनक; वाहतूक विभागाकडून परिवहन विभागाकडे केसेस वर्ग
अतिवेग, सिग्नल तोडणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, गाडी चालवताना मोबाईल वापर अशी कारणे
क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करण्याचे एकही प्रकरण नाही
प्रभाकर धुरी
पणजी : राज्यात गेल्या दोन वर्षात ८९,३४१ चालक परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिस विभागाने परिवहन विभागाकडे पाठवला आहे. ही आकडेवारी जानेवारी ते डिसेंबर २०२४ व २०२५ या दोन वर्षांतील आहे.
या दोन वर्षात एकूण १,६३,३४८ केसेस नोंद करण्यात आल्या. त्यातील ७३,६५२ केसेस २०२४ मधील, तर ८९,६९६ केसेस २०२५ मधील आहेत. २०२५ मध्ये वाहतूक नियमभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये तब्बल २२ टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिस विभागाने ८९,३४१ केसेस परिवहन विभागाकडे चालक परवाना रद्द करण्यासाठी वर्ग केल्या आहेत. त्यात २०२४ मध्ये ५६,२२६ व २०२५ मध्ये ३३,११५ केसेस वर्ग करण्यात आल्या आहेत.
अतिवेग, सिग्नल तोडणे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, मालवाहू वाहनांतून माणसांची वाहतूक, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, मद्य किंवा अमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, दुचाकीवर अधिक व्यक्ती बसवणे या कारणांमुळे वाहतूक नियमभंग झाल्याने वाहतूक पोलिसांनी गुन्हे नोंदवले होते.
अतिवेग, हेल्मेट न वापरण्याचे गुन्हे सर्वाधिक
अतिवेगाने वाहन चालवणे आणि दुचाकीवर हेल्मेट न वापरण्याचे गुन्हे दोन्ही वर्षांत सर्वाधिक आहेत. अतिवेगाचे गुन्हे २०२४ व २०२५ मध्ये अनुक्रमे १८,०७९ व २३,९३५ एवढे, तर हेल्मेट न घालता दुचाकी चालवण्याचे गुन्हे अनुक्रमे ३९,७८१ व ५४,०५५ आहेत. २०२४ पेक्षा २०२५ मध्ये वाहतूक नियमभंगाच्या घटना अधिक घडल्या आहेत.