Goa 
गोवा

Goa Tourism Expensive | इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील खाणे-पिणे, राहण्याचा खर्च अधिक

Goa Tourism Expensive | महाराष्ट्रातील पर्यटकांचे मत : गोव्याची पूर्वीची संस्कृती पुन्हा दिसावी

पुढारी वृत्तसेवा

पणजीः पुढारी वृत्तसेवा

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील खाण्या-पिण्याचा आणि राहण्याचा खर्च अधिक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील पर्यटकांनी दिली. गोव्यातील खाण्यापिण्याचा खर्च परवडत नाही म्हणून गोव्याबाहेरून येणारे पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपली प्रवासी वाहने उभी करून मोकळ्या जागी स्वयंपाक करतात. असे केल्याने पर्यटक हॉटेलमध्ये जेवणाखाण्यासाठी जात नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे स्वयंपाक करणाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती.

सरकारने पण त्याला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे असा उघड्यावर स्वयंपाक करण्यावर बंदी आहे. असाच एक गट स्वयंपाक करून जेवत असताना प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांनी आपली व्यथा मांडली. पर्यटक म्हणाले, आम्ही गोव्यात फिरण्यासाठी येतो. इथला निसर्ग, समुद्र, मंदिरे खूप सुंदर आहेत. त्यांचे आम्हाला पूर्वीपासून आकर्षण आहे.

मात्र, आम्ही ऐकलेली किंवा पूर्वी अनुभवलेली गोव्याची संस्कृती आता दिसत नाही. इथे पब, कॅसिनो संस्कृती वाढते आहे. गोव्यातील जेवणाचे, इतर खाण्याचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. राहण्यासाठी असलेल्या हॉटेलचे दरही खूपच आहेत. इतर राज्यांपेक्षा इथले दर अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटकांनी जेवणाबाबतही नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे जेवण सहज उपलब्ध होते. गोव्यात मात्र तसे नाही. महाराष्ट्रीयन फूड तर क्वचितच मिळते. गोवन फूड खूप चांगले आहे. पण, दर मात्र खूपच जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत पाहता गोवा आणि महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील जेवणाचे व खाद्यपदार्थांचे दर अधिक आहेत.

अलीकडे तर गॅस टंचाईमुळे दरात आणखी वाढ झाली आहे. चहा, कॉफी, नाश्त्यासह जेवणाच्या दरातही वाढ झाली आहे. काही ठिकाणी दर जुने असले, तरी ताटातील काही पदार्थ कमी करण्यात आले आहेत. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा विचार करून त्या-त्या भागातील खाद्यान्नांचा विचार करून ते उपलब्ध केले जाते

. मात्र, देशी लोकांच्या प्रादेशिक खाद्यांनाचा विचार केलेला नाही, अशी भावना देशी पर्यटकांची आहे. त्यातच दुकाने किंवा हॉटेल स्थानिकांची; पण चालवणारे परप्रांतीय असल्याने देशी पर्यटकांच्या आवडीनिवडी ते गांभीर्याने घेत नसल्याचेच दिसते. एकंदरीत राहण्याचा आणि जेवणाखाण्याचा खर्च सर्वसामान्य पर्यटकांना परवड नसल्याने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अनेक देशी पर्यटक स्वतः स्वयंपाक करण्याचा विचार करतात.

सरकारने तोडगा काढण्याची गरज

अर्थात याला स्थानिकांचा विरोध आहे. काही पर्यटक दारू पिऊन बाटल्या बसल्या जागी टाकून जातात. जेवल्यानंतर पेपर किंवा प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक ग्लास, उरलेले अन्न स्वयंपाक केलेल्या मोकळ्या जागीच टाकून जातात. त्यामुळे गोव्याच्या सौंदर्याला बाधा येते, अस्वच्छता वाढते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावर सरकारनेच आता तोडगा काढण्याची गरज आहे. सरकारनेच जेवण्या खाण्याचे, राहण्याचे (हॉटेलमधील रूम) किमान आणि कमाल दर ठरवून द्यायला हवे. गेल्या काही दिवसांत दरावरून मारामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अव्वाच्या सव्वा दर आकारले, तर बाचाबाची, हाणामारी होते. त्यावर आता सरकार आणि पर्यटन खात्याने अंकुश लावायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT