अभिनय करत असतानाच लोककला, दिंडी, भजन यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवून लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या आणि आमोणा येथे जन्मलेल्या आणि लग्न होऊन सत्तरी केरी येथे वास्तव्य करणाऱ्या उत्कर्षा उत्तम गावस या अभिनय हे आपले कर्तव्य मानते. त्यांनी अनेक नाटकांमधून दर्जेदार भूमिका सादर केल्या. श्री पारवडेश्वर मठ सांप्रदायाची शिष्य म्हणून त्यांनी सुरुवातीला लोककलांमध्ये रस घेतला. त्यासोबतच दिंडीही आत्मसात केली. लोककलेचे मार्गदर्शक म्हणून गोपीनाथ विष्णू गावस, जानकी रघुनाथ परब, पौर्णिमा राजेंद्र केरकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
बाबू गडेकर यांच्याकडून दिडींसाठीचे पूर्ण सहकार्य मिळाले. माऊली वारकरी संप्रदायातून त्यांनी तीनवेळा पंढरपूर वारी केल्या. पारडेश्वर महिला मंडळाची त्या अध्यक्षाही आहेत. मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाची जागा नसून समाज मन घडवणारी एक सशक्त चळवळ आहे. या चळवळीत रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये हौशी स्त्री नाट्य कलाकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामध्ये सत्तरी केरी येथील उत्कर्षा उत्तम गावस यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
अभिनयाची आवड आणि समाजाशी संवाद साधण्याची त्यांची तळमळ यातून त्यांनी आपल्याला रंगभूमीशी जोडून घेतले. घर, संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत रंगमंचाची आपल्याला सेवा करायची आहे. त्या ठिकाणी उभे राहणे, हे कठीण असले तरी आत्मविश्वासाच्या बळावर उत्कर्षा यांनी अल्पकाळात भरारी घेतली. अनेक महिला आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून नाटकाच्या तालमी, प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्याचप्रमाणे उत्कर्षा यांनी रंगदेवतेची सेवा करण्यासाठी रंगमंचावर पाऊल टाकले. अल्पकाळात भरारी घेत अभिनय क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केला.
अभिनय हा केवळ छंद नसून आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि आपली ओळख निर्माण करून देण्यासाठी ते एक महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळेच उत्कर्षा यांनी अभिनयाबरोबरच लोककला आणि दिंडी यामध्येही सक्रिय सहभाग घेतला. महिला कलाकारांच्या अभिनयात नैसर्गिकता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो. तो प्रामाणिकपणा उत्कर्षा यांच्या भूमिकेतून दिसून येतो. नाटक आणि भूमिका या समाजातील स्त्रियांच्या भावना, संघर्ष, नाती आणि वास्तव्य यांचे जिवंत चित्रण आतापर्यंत उत्कर्षा गावस यांनी सादर केले आहे. उत्कर्षा यांना कला व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत गेल्या.
या संधी मिळवताना अडचणीही आल्या. परंतु त्यावर त्यांनी मात करत यश मिळविले. हौशी स्त्री नाट्य कलाकार या रंगभूमीच्या खऱ्या अर्थाने आधारस्तंभ मानल्या जातात. तशाच प्रकारची उत्कर्षा उत्तम गावस हिनेही आपली प्रतिमा तयार केली. त्यांनी केवळ अभिनय जपला नाही, तर समाजात संस्कृतीची ज्योतही तेवत ठेवली. संतवाणीतून दिंडीत सहभाग आणि लोककलेचा अभ्यास करत करत धडे घेत लोककलाही अवगत करत त्यांनी सादरीकरणावर भर दिला. त्यासाठी त्यांनी दिग्गज कलाकारांकडून मार्गदर्शन घेतले.
उत्कर्षा गावस यांचा जन्म १० सप्टेंबर १९६७ मध्ये आमोणे येथे झाला. २०१२ साली अमृत मोहिनी या नाटकामध्ये त्यांनी प्रथम भूमिका सादर केली. चंद्रकांत गावस, अर्जुन गोपी गावस यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. अर्जुन गोपी गावस हे त्यांचे गुरू आहेत. त्याकाळात बाबा पुंडलिक सिनारी नाटकात काम करायचे. दशावतार नाटकांमध्ये स्त्रीच्या भूमिका ते सादर करायचे. त्यांचा आदर्श घेत उत्कर्षा यांनी सुरुवातीच्या काळात शाळेत हायस्कूलमध्ये गॅदरिंगमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर लग्नानंतर वेगवेगळ्या नाटकांमध्ये भूमिका केल्या. यात गीता गाती ज्ञानेश्वर, सत्यविजय, मत्स्यगंधा, संत गोरा कुंभार, ययाती देवयानी, संशय कल्लोळ, रणदुंदुभी, शिवपार्वती युद्ध, माया मच्छिंद्र, सत्वपरीक्षा आदी नाटकांचे राज्यासह महाराष्ट्रात दर्जेदार प्रयोग झाले. सोबतच श्री आजोबा दशावतार मंडळामार्फत अनेक दशावतार नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकार केल्या.
नाट्य स्पर्धेमध्येही त्यांना चारवेळा प्रथम क्रमांक मिळाला, संशय कल्लोळ नाटकासाठी त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. नाटकात भूमिका करताना किंवा एखादी नाटकाची मागणी आली तर उत्कर्षा लगेच होकार देतात. कधी मानधनाची अपेक्षा केली नाही. कला जगभर पोहोचावी, यासाठी आपले प्रयत्न आहेत. आपली कला आपले मुलगे नक्कीच पुढे चालवतील, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात.
उत्कर्षा गावस यांच्या माहेरी पूर्वी मोठ्या प्रमाणात नाटकाच्या तालमी व्हायच्या. त्या तालमी पाहून त्यांना नाटकाची आवड लागली. वडील व भाऊ यांनी अनेकदा तिला प्रोत्साहन दिले. घर, संसार सांभाळत असताना उत्कर्षा गावस यांना त्यांचे पती उत्तम गावस यांनी नेहमीच सहकार्य केले. आपण ज्यावेळी नाटकाच्या दिवशी रंगमंचावर पाऊल ठेवते, त्यावेळी भूमिका अंगात आपल्या संचार करत असते. त्या भूमिकेशी समरस होऊन आपण आपली भूमिका दर्जेदार होण्यावर भर देत असते, असे सांगतानाच वर्षा उसगावकर ही सिनेअभिनेत्री आपली आवडती अभिनेत्री असल्याचे त्यांनी सांगितले.
दशावतार नाटकांमध्ये उत्कर्षा यांनी ४० पेक्षा जास्त भूमिका आणि प्रयोग सादर केले. आपली भूमिका अधिक दर्जेदार होण्यासाठी इतर नाटकांचे प्रयोग आपण आवर्जून पाहते. अभिनय करत असतानाच आपण राज्यभर दिंडी उत्सवामध्ये सहभाग घेतला. दर्शवला दिंडी आणि गायन स्पर्धेत सहभाग दर्शवून अनेक वेळा बक्षिसे मिळवली. ही बक्षिसे म्हणजे प्रेक्षकांकडून मिळालेली दाद होय, असे त्या सांगतात. दिंडी सादर करत असताना त्या दिंडीमधून संतांचे गुण गाण्याची संधी मिळते, असे सांगायला उत्कर्षा विसरत नाही.
भजनातही अव्वल...
रामचंद्र नाईक, विठ्ठल गावस यांच्याकडून भजनाचे धडे घेतले. गणपती समोर मोफत भजन सादर केले जाते. २०१९ मध्ये लोककला फुगडी, धालो, देखणी दवली मांड कळशी नृत्य असे वेगवेगळे कलाप्रकार आपण सादर केल्याचे सांगून राजीव कला मंदिरमध्ये फुगडी स्पर्धेतही प्रथम क्रमांक, पारडेश्वर महिला मंडळ केरी सतरी या ठिकाणी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. ८० पेक्षा जास्त ठिकाणी फुगडी, भजन, अभिनय सादर केल्याचे त्या सांगतात. या कलेमुळे संसाराकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी आपले पती या नाट्य क्षेत्राला वाव देत असतात. त्यामुळे आपणही काम करत आहे. २०२५ मध्ये कला संस्कृती खाते अंतर्गत प्रयागराज महाकुंभाला आम्ही लोककला सादर केल्याचे त्या आवर्जून सांगतात.