पणजी : बेकायदा डोंगर कापणी रोखण्यासाठी नगर व शहर नियोजन (टीसीपी) मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या उल्लंघनाबद्दल अधिकाधिक १ कोटीच्या दंडाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगर व शहर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
नव्या निर्णयानुसार, परवानगीशिवाय डोंगर कापणी करताना आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर किमान ५० लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. गंभीर अथवा वारंवार होणाऱ्या उल्लंघनांच्या प्रकरणांमध्ये हा दंड ७५ लाख रुपयांपासून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद केली आहे.
मंत्री राणे यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व डोंगर कापणीच्या कामांवर टीसीपी खात्याकडून कडक नजर ठेवली जाईल. संबंधित कामाला परवानगी असो वा नसो, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास खाते तातडीने कारवाई करेल. विकासकामांच्या नावाखाली डोंगर कापणी आणि भूखंड विकासामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.