पणजी : अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा कळंगुट आणि बागा येथे टाकलेल्या छाप्यात निकृष्ट दर्जाचे काजू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. तपासणी पथकाने कळंगुटमधील 9 दुकाने आणि बागामधील 10 दुकानांची तपासणी केली. यात 8 दुकाने बंद करण्यात आल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.
कळंगुटमध्ये निकृष्ट दर्जाचे काजू विकल्याबद्दल एक दुकान बंद करण्यात आले, तर बागा येथे 7 दुकाने बंद केली. यासंबंधी पुढील चौकशी सुरू आहे. यात बागा येथील 7 दुकानांना 50 हजारांचा दंड ठोठावला. निकृष्ट दर्जाचे काजू विकणार्या विक्रेत्यांवर आणि चुकीच्या ब्रँडचे काजू विकणार्या विक्रेत्यांवर 20 हजारांचा दंड आकारण्यात आला. बागा जंक्शनवरील खाद्यपदार्थ विकणारे 3 रेस्टॉरंट्सही बंद करून त्यांना 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला .
संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासणी पथकात अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, दरलन दिवकर, प्रीतम परब आणि सुजाता शेटगावकर यांच्यासह एमटीएस अर्जुन नाईक, संदीप शेळके आणि प्रदीप पार्सेकर यांचा समावेश होता.