पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या राजकारण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली फोंडा विधानसभा मतदारसंघाची पोटनिडवणूक ९ एप्रिलला होणार आहे. इतर राज्यांबरोबर गोव्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्याने उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून, १६ मार्च रोजी निवडणुकीची राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ मार्च असून २४ मार्च रोजी अर्जाची छाननी केली जाईल.
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २६ मार्च आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ६ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. कर्नाटक, नागालँड व त्रिपुरा या राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाबरोबर गोव्यातील पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. दरम्यान, फोंडा मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक सहा महिन्यात घेणे आवश्यक आहे. ती मुदत येत्या १५ एप्रिलला संपत असल्याने त्यापूर्वीच ही निवडणूक होत आहे.
काँग्रेसमध्ये हल्लीच प्रवेश केलेले मगोचे माजी नेते केतन भाटीकर हे उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यांचे फोंड्यात असलेले कार्य व भाजपला टक्कर देऊ शकणारे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
भाजपची उमेदवारी दिवंगत माजी मंत्री रवी नाईक यांच्या सुपुत्राना दिली जावी, अशी मागणी भंडारी समाजाकडून होत आहे. भाजपने यापूर्वीच दोन नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनानंतर त्यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिली गेली, त्याप्रमाणे नाईक यांच्या एका पुत्राला ही उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
घटलेल्या मतांचा लाभ कोणाला ?
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक ही नव्याने राज्यात सर्व्हे झालेल्या मतदार यादीनुसार होणार आहे. एसआयआर सव्र्व्हेनुसार फोंडा मतदारसंघातील सुमारे ४२३० मतदार हे मतदार यादीतून घटले आहेत.
त्यामुळे निवडणुकीत समीकरणे बदण्याची दाट शक्यता आहे. या समीकरणानुसार राजकीय पक्षांनाही त्यांची रणनीती आखावी लागणार आहे. २०२३ च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघात ३२,१५७ मतदार होते. एसआयआर सव्र्व्हेनंतर मतदार संख्या २७, ९२७ वर आली आहे. त्यामुळे या घटलेल्या मतदारामुळे लाभकोणाला होतो, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.