पणजी : पणजीतील सांतिनेज व दोनापावला येथे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश करत क्राईम ब्रँचने धडक कारवाई केली. या कारवाईत १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कॉल सेंटरमधून लॅपटॉप, मोबाईल्स फोन, हेडफोन्स, चार्जर्स तसेच एक कार मिळून सुमारे ३० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम बँचच्या पथकाने पणजी येथील डुकले एलिट अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. ही कारवाई मध्यरात्री २ च्या सुमारास करण्यात आली, बनावट कॉल सेंटर सुरू करून संशयितांनी अमेरिकेतील नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले.
पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांमध्ये यश देसाई (वय २९), करण माला (२३), मिहीर देसाई, सज्जन, ऋषव चौबे (२६), दिब्या ज्योती रावा (३०), रुशित बाथम (२८), आमिर अली (३४) आणि विश्वजित सोनवणे (३२) यांचा समावेश आहे.
संशयितांनी लॅपटॉप आणि व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा (व्हीपीएन) वापर करून 'आयबीम' अॅपद्वारे स्वतःला कर्ज देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी भासवत अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधला. त्यांना कर्ज व तत्काळ पैसे देण्याचे आमिष दाखवून सेफोरा, मेरसीस, अॅपल, झोक्स यांसारख्या गिफ्ट कार्ड्सच्या स्वरूपात मोठ्या रकमांची फसवणूक करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी ७ लॅपटॉप, १३ मोबाईल फोन, हेडफोन्स, चार्जर्स तसेच एक कार जप्त केली असून, एकूण मुद्देमाल सुमारे 30 लाख रुपयांचा आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलमे ३१९ (२), ३१८(४), ६१ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी व ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोनापावला परिसरातील एका व्हिलामध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकत क्राईम ब्रचने ९ जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान करण्यात आली.
पोलिस निरीक्षक मंगेश वळवाईकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सागर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, दोनापावला येथील व्हिला सोलेस कपूरच्या अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर छापा टाकला. या कारवाईत महिपालसिंह राठोड (२३), शुभम देसाई (२७), संतनु कार (३०), संकल्प काणे (३२), अक्षित पाटील (२६), सत्यम सिंग, बिजेश राणे (४०), रोहन आणि विलास उटेकर व शेलत युनूसभाई संशयितांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात विविध राज्यांतील संशयितांनी एकत्र येऊन हा गैरप्रकार चालवला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.