पणजी :घराघरात पावसाळ्यात लागणाऱ्या जीवनावश्यक सामानाची बेगमी सुरू झाली आहे. पावसाळ्यात जेवणासाठी लागणारा मसाला तयार करणे हा महिलांच्या आवडीचा विषय. मात्र, यावर्षी मसाल्याच्या मिरचीचा भाव खूप वाढला आहे. स्थानिक गावठी मिरची तब्बल एक हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच ब्याडगी मिरची ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच इतरही विविध प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत.
आता पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने मिरच्या आणि मसाल्याच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. मिरचीसोबत लसूण आणि मसाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकांना बाजारात पाकिटातून विकली जाणारी मिरची पावडर घेणे परवडणारे वाटत आहे.
तथापि, पारंपरिक पद्धतीने घरी मिरच्या वाळवून मसाला बनवणे आणि जेवणाची लज्जत वाढवणे यातील आनंद वेगळाच असतो. त्यामुळे महाग असली, तरी मिरचीला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत.
कोकमही खाताहेत भाव
माशाच्या कढीसाठी व अन्य शाकाहारी, मांसाहारी खाद्य पदार्थात वापरली जाणारी कोकम सोले सध्या भाव खात आहेत. त्यांचा दर तब्बल ३०० रुपये पावकिलो आणि हजार रुपये किलो असा आहे. यंदा कोकमचे पीक कमी आल्याने दरवाढ झाली आहे. कोकम आगळ १५० ते २०० रुपये प्रतिलिटर दराने विकला जात आहे. चिंच ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. यासोबतच बाजारात सुकी मासळी, उकडे तांदूळ, अळसांदे व इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे.