सांगे : पुढारी वृत्तसेवा
रिवण पंचायत क्षेत्रातील दानोळे-केवण येथे खेळाच्या मैदानासाठी सपाटीकरणाचे काम सुरू असताना वन खात्याने हस्तक्षेप केल्याने ग्रामस्थ आणि वन अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या प्रकरणानंतर आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दानोळे-रिवण येथील क्लबचे युवक आणि ग्रामस्थ यांनी श्रमदानातून खेळाचे मैदान विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यासाठी दोन यंत्रसामग्री आणि ट्रकच्या साहाय्याने जवळपास ५० मीटर अंतरावरील वन खात्याच्या क्षेत्रात पूर्वी डंप करण्यात आलेली खाण अवशेषांची (मायनिंग रिजेक्शन) माती आणून मैदान सपाट करण्याचे काम सुरू करण्यात आले.
काम सुरू असतानाच वन खात्याचे गार्ड, उपवनसंरक्षक (डीसीएफ) आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी हे काम थांबविले. यानंतर अधिकारी आणि युवक यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. माहिती मिळताच मंत्री सुभाष फळदेसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फळदेसाई म्हणाले की, "डंप करून ठेवलेली खाण अवशेषांची माती गावातील मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी वापरली जात असेल, तर त्यात गैर काय आहे?
ज्या ठिकाणी ही माती टाकण्यात आली होती, त्या परिसरात २०११ पासून युवक खेळत होते. आजही तेथे फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे खांब अस्तित्वात आहेत. ते पुढे म्हणाले की, जेव्हा खाण कंपन्यांनी ही माती येथे डंप केली, तेव्हा वन खात्याने त्याबाबत आक्षेप घेतला नव्हता. मात्र आता गावाच्या हितासाठी काम सुरू असताना ते थांबविणे योग्य नाही.
ग्रामस्थांना धमकावणे किंवा त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरणेही अयोग्य आहे. ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहताना फळदेसाई यांनी, "जर या प्रकरणात ग्रामस्थांवर तक्रार दाखल करायची असेल, तर माझ्यावरही तक्रार दाखल करा, असे वन अधिकाऱ्यांना सांगितल्याचे उपस्थितांनी सांगितले.