डिचोली : म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रश्नावर जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केलेले विधान वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आणि जनतेची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी केला आहे. कळसा प्रकल्पाचे पाणी अद्याप मालप्रभा नदीत वळविण्यात आलेले नाही, असे विधान करणे चुकीचे असून, म्हादईचे पाणी मालप्रभा खोऱ्यात वळविण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपूर्वीच सुरू झाली आहे, असा दावाही प्रा. केरकर यांनी केला.
केरकर म्हणाले की, २००६ पासूनच कर्नाटककडून कळसा प्रकल्पाच्या माध्यमातून म्हादईचे पाणी मलप्रभा नदीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यावेळी पाणी वळविले जाणार नाही, अशी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कळसा प्रकल्पाच्या कामांना चालना देण्यात आली. भुयारी कालव्यांसह विविध बांधकामे करण्यात आली असून, त्यातून कळसाचे पाणी मालप्रभा खोऱ्यात नेण्याची व्यवस्था केल्याचा दावा त्यांनी केला.
म्हादईच्या पाणीवाटपाचा प्रश्न २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. कळसा-भांडुरा प्रकल्प आणि पाणी वळविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिली. त्यामुळे या विषयावर विधान करताना न्यायालयीन आदेश, सरकारी कागदपत्रे आणि प्रत्यक्ष परिस्थिती तपासणे आवश्यक आहे, असे केरकर यांनी सांगितले.
म्हादई ही गोव्याच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नदी आहे. तिचे पाणी वळविल्यास नदीप्रवाह, भूजल, शेती आणि पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. तसेच कळसा प्रकल्पानंतर भांडुरा प्रकल्पाच्या कामांची तयारी सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. तिळारीचे पाणी कर्नाटककडे वळविण्याच्या विषयावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.