पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा नगरपालिकेने शहरातील ४२ असुरक्षित व धोकादायक इमारतींची ओळख पटवली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून ही पाहणी करण्यात आली असून, जीर्णावस्थेतील इमारतींमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यावर प्रशासनाचा भर आहे. म्हापसा पालिकेने केलेल्या तपासणीत अनेक इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, संबंधित इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
इमारती रिकाम्या करण्याच्या सूचनांसह आवश्यक दुरुस्ती अथवा सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या इमारतींची तपासणी केली जात आहे.
मान्सून काळात दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईचा उद्देश मान्सूनदरम्यान जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे हा असून, शहरातील इतर जुन्या इमारतींचीही फेरतपासणी केली जाणार आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.