पणजी : प्रभाकर धुरी
राज्यात बिबट्या आणि ब्लॅक पँथरबाबत एकाच दिवशी दोन घटना घडल्या. चरावणे, ठाणे येथे बिबट्यामुळे पोलिस कर्मचारी यशवंत गवस यांचा मृत्यू झाला, तर कुडणे, साखळी येथे गणेश मळीक या युवकाला ब्लॅक पँथर दिसले. या दोन्ही घटना पश्चिम घाट परिसरातील आहेत. दुसरीकडे राज्याच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्गातही महाशिवरात्रीला एकाच दिवशी वाघ आणि ब्लॅक पँथर दिसले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात जाताना आनंद गावडे यांना आंबोलीत वाघ दिसला, तर तेरवण- मेढे रस्त्यावर तेरवण येथील ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला ब्लॅक पँथर दिसला. गोवा आणि महाराष्ट्र अशी दोन वेगवेगळी राज्ये असली, तरी या राज्यांना जोडणारा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर एकच आहे. पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक असलेले वन्यजीव वाचवायचे असतील, तर सह्याद्रीतील गोवा ते आंबोली हा वाइल्डलाईफ कॉरिडॉर जपण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गेळे - आंबोली येथील मलय नावाने परिचित असलेल्या भागात लिंगाची राई आहे. या देवराईत असलेल्या महादेवाच्या प्राचीन स्थळाकडे जाताना स्थानिक ग्रामस्थ आनंद गावडे, नारायण लाड, अनिल सुतार, संदीप सुतार व आनंदची मावशी यांना कच्च्या रस्त्यालगतच्या झाडीत वाघ दिसला. त्यांच्यासमोर अगदी सात आठ फुटांवर तो वाघ होता. प्रत्यक्ष वाघ बघून ते स्तिमित झाले.
देवराया वाचवायला हव्यात
आंबोली परिसरात दिसलेला वाघ देवराईतील घनगर्द जंगलात आढळला. जंगले नष्ट झाल्याने बिबटे, वाघ, गवे, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा मानवी वस्तीत येत आहेत. पूर्वी देवराई जपल्या जायच्या, आता त्या तोडल्या जात आहेत. त्या जपायला हव्यात; अन्यथा वस्तीत येण्याशिवाय वन्य प्राण्यांना दुसरा पर्यायच उरणार नाही.