डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराई जत्रोत्सवात हजारो व्रतस्त धोंडांनी मंगळवारी मध्यरात्री अग्निदिव्य पार केले. अग्निदिव्य सोहळा बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. हा सोहळा पाहण्यासाठी हजाराच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी व सरकारी अधिकाऱ्यांनी यावर्षी शिरगावात चोख व्यवस्था केल्याने कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. सर्वांना व्यवस्थित देवदर्शन तसेच होमकुंडाच्या ठिकाणी रांगेत दर्शन घेण्याची सोय करण्यात आली होती. अग्निदिव्य पार केल्यानंतर बुधवारपासून देवीच्या कौलत्सवास
प्रारंभ झाला आहे. गावातील प्रत्येक घरात देवी कौल देणार असल्याने आगामी चार दिवस हजारोंच्या संख्येने गोवा व इतर भागातून भाविक शिरगाव दाखल होणार आहेत. त्यासाठी सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व प्रशासनाने आवश्यक सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.