हरमल : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात रहिवासी ग्रामस्थांच्या घरांना वीज व नळ जोडणी देण्याचे अभिवचन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्यासाठी ईएचएन नंबर दिले जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आनंदित होते; परंतु सरकारने अद्याप परिपत्रक जारी न केल्याने ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली आहे.
गेली अनेक वर्षे पंचायतीकडून स्थानिकांच्या घरांना ईएचएन नंबर देण्यात येत होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थ, रहिवाशांना याचा फायदा झाला व वीज, पाणी पुरवठा घेण्याची संधी मिळाली. मात्र, सध्या पंचायत कार्यालयात खेपा घालूनही नंबरसाठी मागणी केल्यास, सरकारकडून परिपत्रक जारी न झाल्याचे सांगून माघारी पाठवले जाते, असे एका नागरिकाने सांगितले.
कोणत्या कारणासाठी पंचायतींना आदेश जारी करण्यात आले नाहीत. याचा उलगडा होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश कोणी अधिकारी जाणूनबुजून शुक्राचार्य बनून अडवून तर ठेवीत नाही ना, अशी शंका काहींनी व्यक्त केली. दरम्यान, पंचायत स्तरावर पंचायती उत्कृष्ठ काम करीत असल्याने त्यांचे अधिकार सीमित करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल ग्रामस्थ करतात. सध्या अनेक बाबतीत पंचायत सदस्य हवालदिल झाले आहे.