पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मान्सूनला अपेक्षित वेग न मिळाल्याने गोवा सरकारने पाणीटंचाई टाळण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्याकडे पुढील महिन्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिरोडकर यांनी सांगितले की, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पर्यायी स्रोतांचा वापर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
त्यानुसार, पिसुर्ले खाण परिसरातून पाडोशे जलप्रक्रिया केंद्रासाठी दररोज सुमारे ४० ते ५० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, पुढील १५ दिवसांत पावसाची स्थिती सुधारली नाही, तर तिलारी कालवा हा पर्यायी जलस्रोत म्हणून वापरण्याची तयारी सरकारने केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, सध्या पाणी उपलब्धतेबाबत कोणतीही तातडीची चिंता नसून साळावली आणि आमठाणे धरणांमध्ये २० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा शिल्लक असून तो किमान एका महिन्यासाठी पुरेसा आहे.
मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा काही ठिकाणी वाहने धुणे आणि बागांना पाणी देण्यासाठी वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून, हा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचा इशारा फळदेसाई यांनी दिला.