पणजी : पुढारी वृत्तसेवा
उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा स्ट्रोकचा (झटका) सर्वात मोठा धोका असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाच्या न्यूरोलॉजी विभागाच्या मते सुमारे ७० टक्के स्ट्रोकची प्रकरणे ही उच्च रक्तदाबाशी संबंधित आहेत. नेहमी ४ ते ५ नवे रुग्ण दाखल होत असल्याचा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे रक्तदाब नियमित नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. तेरेसा फेरेरा यांच्या माहितीनुसार, अनियंत्रित रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण येऊन स्ट्रोकचा धोका वाढतो. अनेकदा रुग्णांना उच्च वत्तदाब असल्याची माहिती नसते किंवा औषधे नियमित घेण्यात निष्काळजीपणा होतो, ज्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
दररोज जीएमसीमध्ये स्ट्रोकची तीन ते पाच नवीन प्रकरणे दाखल होत असून, यामध्ये सौम्य ते गंभीर स्वरुपाच्या रुग्णांचा समावेश असतो. अलीकडेच एका ५२ वर्षीय व्यक्त्तीला तीव्र स्ट्रोकनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्तीला दोन वर्षापासून उच्च रक्तदाब होता, मात्र औषधे बंद केल्यामुळे त्याला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवू लागला. तसेच, आणखी एका ६९ वर्षीय रुग्णाला गोंधळाची स्थिती आणि झटके आल्याने जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले.
तपासणीत त्या व्यक्तीचा खत्तदाब २४०/१२० इतका अत्यंत धोकादायक असल्याचे आढळले. डॉक्टरांच्या मते, दीर्घकाळ अनियंत्रित रक्तदाबामुळे मेंदूसह शरीरातील विविध अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे केवळ स्ट्रोकच नव्हे तर मेंदूमध्ये रक्तस्राव (इंट्राकॅनियल ब्लीड), स्मरणशक्तीवर परिणाम, मूत्राशय नियंत्रणातील समस्या आणि शारीरिक हालचालींमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. अनेक रुग्र्णाना स्ट्रोकनंतर कायमस्वरूपी अशक्तपणा किंवा दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होतात.
दरमाह रक्ततपासणी आवश्यक
विशेषतः २० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एकदा रक्तदाब तपासून घ्यावा, तसेच उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्यांनी दर महिन्याला तपासणी करून औषधे नियमित घ्यावीत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.