मडगाव : पुढारी वृत्तसेवा
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी शनिवारी (दि.४) गोंयकार घर परिसरात स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष भातलावणीत सहभागी होत गोव्यातील शेती आणि कृषी परंपरेप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. पारंपरिक शेतीचे जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी जोड दिल्यासच 'हरित गोवा'ची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भातलावणीच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरदेसाई म्हणाले की, गोव्याची ओळख केवळ पर्यटनामुळे नाही, तर समृद्ध कृषी संस्कृतीमुळेही आहे. मात्र, राज्यातील सुमारे २० हजार हेक्टर सुपीक जमीन पडीत असल्याची बाब चिंताजनक आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक कृषी यंत्रणांच्या साहाय्याने भातलावणी, तणनियंत्रण, पिकांची देखभाल आणि कापणी यांसारखी कामे अधिक कार्यक्षमतेने करता येतील.
त्यामुळे शेतकऱ्यांवरील श्रम कमी होतील, उत्पादनक्षमता वाढेल आणि तरुण पिढीचा शेतीकडे कल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाण्याचा कार्यक्षम वापर, खतांचे योग्य नियोजन, पिकांवरील रोगांचे वेळेवर निदान आणि उत्पादन खर्चात बचत यासाठीही आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे ते म्हणाले.
राज्यातील पडीत जमिनी पुन्हा लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि एआय-आधारित कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या सहभागाचे स्वागत केले.