Goa Fishing Industry 2026  
गोवा

Goa Fishing Trawlers | बंदी उठून 9 दिवस झाले तरी ट्रॉलर किनाऱ्यावरच! गोव्यात ताज्या मासळीसाठी खवय्यांची प्रतीक्षा

Goa Fishing Trawlers | हवामान अनुकूल होण्याची शक्यता ; खवय्यांना ताज्या मासळीची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मासेमारी बंदी १ ऑगस्टपासून उठली असली, तरी विविध कारणांमुळे ट्रॉलर समुद्रात लोटण्यास अजूनही अवकाश आहे. सध्या बहुतेक ट्रॉलर मांडवी नदीवरील मालीम जेटीवर उभे करून ठेवण्यात आले आहेत. मासेमारीचा हंगाम अद्याप सुरू न झाल्याने मत्स्यखवय्ये निराश झाले असून, कधी एकदा ताजी मासळी बाजारात येते, याचीच त्यांना प्रतीक्षा लागली आहे.

दरवर्षी १ ऑगस्टपासून बहुतेक ट्रॉलर खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना होतात. मात्र, यंदा समुद्रातील प्रतिकूल हवामान, ट्रॉलरवर काम करणाऱ्या मजुरांना गोव्यात परतण्यास लागलेला वेळ आणि अन्य कारणांमुळे ट्रॉलर अद्याप किनाऱ्यावरच आहेत. मासेमारी बंदी उठून जवळपास नऊ दिवस झाले आहेत.

जे मजूर गोव्यात परतले आहेत, त्यांनाही ट्रॉलर समुद्रात न गेल्याने किनाऱ्यावरच थांबावे लागत आहे. असे असले तरी आता हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरला असून वाऱ्याचा वेगही कमी होत आहे.

खवळलेला समुद्र शांत होण्याची चिन्हे दिसत आहेत. मच्छीमार तसेच मच्छीमार नेत्यांनी १५ ऑगस्टच्या आसपास मासेमारीला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान अनुकूल राहिल्यास आणि अन्य अडचणी दूर झाल्यास यंदाचा मासेमारी हंगाम जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.

पणजीत मासे महागले

राज्याबाहेरील मासे पणजीच्या बाजारात येत असले, तरी त्यांचे प्रमाण कमी असल्याने माशांचे दर चढे आहेत. त्यातच बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या माशांचा साठवणीतील मासळीमध्ये समावेश आहे. पणजी बाजारात रविवारी मध्यम आकाराचे बांगडे ३०० रुपये किलो दराने विकले जात होते. वाट्यावर २०० रुपयांना सात बांगडे मिळत होते.

राज्यात ऊन, पावसाचा खेळ

गेल्या २४ तासांत राज्यात ३४१.५ मि.मी. पाऊस पडला. सर्वाधिक ४०.३ मिमी पावसाची नोंद पेडणे येथे, तर सर्वांत कमी १७.८ मिमी पावसाची नोंद पणजी व साखळी येथे झाली. पावसाची तूट ३०.६ टक्के एवढी असून गेल्या चोवीस तासांत मागच्या २४ तासांच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला.

हवामान विभागाने १५ ऑगस्टपर्यंत ग्रीन अलर्ट जाहीर केला असून कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. राज्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील कमाल तापमान १५ ऑगस्टपर्यंत ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस असणार आहे. किमान आर्द्रता ६० ते ७० टक्के, तर कमाल आर्द्रता ९० ते १०० टक्के असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT