पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील मासेमारी बंदी १ ऑगस्टपासून उठणार असल्याने मच्छीमारांनी पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली आहे. हंगाम २४ तासांवर आला असला, तरी कामगारांची कमतरता, जेटीवरील अपुऱ्या सुविधा आणि डिझेलवरील व्हॅट परतावा प्रलंबित असल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.
हंगाम सुरू होत असल्याने बोटींची डागडुजी, जाळ्यांची दुरुस्ती आणि अन्य तयारी पूर्ण झाली असली, तरी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेक बोटी समुद्रात जातील की नाही, अशी शंका आहे. अलीकडे मच्छीमारांच्या छोट्या होड्यांना मोठ्या प्रमाणावर सोलार प्रॉन्स मिळाले आहेत. बंपर कॅचमुळे यावर्षीचा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
एका बोटीवर किमान ३० खलाशांची गरज असताना ५० टक्क्यांहून अधिक परराज्यातील मजूर अद्याप गोव्यात परतलेले नाहीत. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या दिवशी किती टक्के 'पर्ससीन' बोटी समुद्रात उतरू शकतील, याबद्दल साशंकता आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून डिझेलवरील व्हॅट परतावा मिळाला नसल्याने बोट मालक आर्थिक संकटात आहेत.
सध्या वापरात असलेल्या तात्पुरत्या जेटीवर बोटी नांगरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने दुहेरी रांगेत बोटी उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे डिझेल व बर्फ भरणे आणि मासोळी उतरवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. जेटीवरील सुलभ शौचालयाचे कामही गेली दोन वर्षे अपूर्ण असल्याने मजुरांची गैरसोय होत आहे. राज्यातील काही जेटीवर यापूर्वी खलाशांना डेंग्यूसारखे आजार झाले होते. अशा स्थितीत खलाशांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्यानेही मच्छीमार चिंतेत आहेत.