पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने २०२४ पासून राज्यात पर्यावरणपूरक ईव्ही बससेवा सुरू करत, कॅशलेस प्रवासासाठी विशेष बस तिकीट कार्ड प्रणाली लागू केली. मात्र, अनेक ठिकाणी बसचालक थांब्यांवर बसेस थांबवत नसल्याने बस सुविधेचा बोजवारा उडाल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काही अधिकृत बसथांबे उभारण्यात आले असले तरी, प्रशासनाने ई-बस मार्गावरील इतर ठिकाणीही बस थांबविली जाईल, अशी माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक चालक प्रवाशांना हात दाखवूनही बस न थांबविता पुढे जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशाच एका घटनेत, सांताक्रुझ येथील एका गर्भवती महिलेला मोठा त्रास सहन करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला दररोज ज्या ठिकाणी बसची वाट पाहते, त्या ठिकाणी बांबोळी सांताक्रुझ पणजी मार्गावरील ई-बस अनेकदा थांबत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये ती बराच वेळ बसची प्रतीक्षा करत होती.
विशेष म्हणजे, बसमध्ये सुमारे ६० टक्के जागा रिकाम्या असूनही चालकाने बस न थांबविल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गाला वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात अडचणी येत असून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अद्याप अपेक्षित प्रमाणात प्रवाशांनी कार्ड प्रणालीचा स्वीकार केलेला नसल्याचेही दिसून येत आहे.
जनजागृती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अभावामुळे या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रवाशांच्या मते, व्यवस्था असुरक्षित आणि गैरसोयीची असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ई-बस सेवा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि प्रवासीहिताची करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बसेसची संख्या वाढवा !
ईव्ही बसेस आल्यानंतर आधीपासूनच सुरू असलेल्या खासगी बसेस हळूहळू बंद झाल्या. अनेक मार्गावर तर पूर्णपणे खासगी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. मात्र याचा फायदा होण्याऐवजी प्रवाशांना तोटाच होत आहे. कारण खासगी बसेसची संख्या अधिक असल्याने केव्हाही त्या उपलब्ध होत्या. मात्र ईव्ही बसेस मर्यादितच असल्याने बरेच तास, विशेषतः दुपारच्या वेळी बसेसच नसल्याने सार्वजनिक परिवहन सेवेवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
प्रक्रिया सोपी करा!
अनेकांकडे अद्याप कार्ड नसल्याने आणि याबाबत पुरेशी माहितीही नसल्याने सगळ्यांचाच वेळ वाचावा यासाठी कार्ड मशिनजवळ किंवा बसमध्येच अधिकृत क्यूआर स्कॅन करण्यासाठीची सोय करावी, अशी मागणी काही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण मंडळींनी केली.
विनावाहक यंत्रणा की डोकेदुखी?
अनेक मार्गावरील बस सेवा 'विनावाहक' करण्यात आल्याने नवीन अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. कार्डधारक प्रवासी कार्डद्वारे तिकीट घेत असले तरी रोख व्यवहाराची सुविधाही सुरू आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालवितानाच तिकीट वितरण करावे लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. अनेकदा चालक मुख्य पणजी बसस्थानकापूर्वी बस १० ते १५ मिनिटे थांबवून सर्व प्रवाशांना तिकीट देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.