पणजी : पुढारी वृत्तसेवा
विदेशांतील सहलींवर जाण्यापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा गोव्याला नक्कीच फायदा होईल. जे भारतीय देशाबाहेर लग्न करत होते, त्यांच्यासाठी आता गोवा आणि जयपूर ही लग्नसमारंभासाठी पसंतीची ठिकाणे बनली आहेत. त्यातही भारतीय लोक गोव्याला प्राधान्य देतात, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. दरम्यान, क आणि ड श्रेणीतील नवीन हॉटेल्सच्या नोंदणीवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले घालण्याचा आणि विद्यमान हॉटेल्सना स्वतःमध्ये सुधारणा करणे अनिवार्य करण्याचा विचार पर्यटन खाते करत आहे.
अशी माहिती पर्यटन मंत्री रोहण खंवटे यांनी दिली. मान्सून पर्यटनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी संबंधित घटकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मंत्री खंवटे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा आदी उपस्थित होते.
मंत्री खंवटे म्हणाले, पावसाळी पर्यटनादरम्यान जंगल सफारी आणि धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी पर्यटन खात्याचे संचालक आणि सचिव हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. सध्या अनेक नोंदणी नसलेले टूर ऑपरेटर्स कोणतीही जबाबदारी न घेता ग्रामीण भागात पर्यटकांना घेऊन जातात. आम्ही पराग रांगणेकर यांना सोबत घेतले आहे, जे जास्तीत जास्त १० लोकांचा गट करून पर्यटकांना फिरवायला नेतील. ते केवळ व्यवसायाच्या हेतूने नव्हे, तर पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने काम करतील.
या अनधिकृत ऑपरेटर्सना रोखण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचना प्राप्त झाल्यानंतर लगेचच त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे खंवटे म्हणाले. पूर्वी बहुतांश भारतीय डेस्टिनेशन वेडिंगसाठी बहरीन आणि दुबईला जात असत. परंतु अमेरिका-इराण तणावामुळे तिथे अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे लमसमारंभ आयोजित करण्यासाठी या पर्यटकांनी गोव्याची निवड केली आहे. यातून मोठ्या प्रमाणात महसूलही मिळत असल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.
महिन्याभरात 'माईस ब्युरो' होईल कार्यरत
गोव्यात 'माईस' पर्यटनांतर्गत परिषदा आणि मोठे इव्हेंट्स मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 'माईस ब्युरो' स्थापन करण्यास सांगितले आहे. महिन्याभरात हा 'माईस ब्युरो' कार्यरत होईल, अशी माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
देशी-विदेशी पर्यटकांमध्ये वाढ
यावेळी देशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. सध्या 'मिलेनियल्स' आणि 'जेन-झी' (युवा पिढी) अगदी ऐनवेळी आपले ट्रिप प्लान करतात आणि त्यांचा पहिला विचार गोव्याला जाण्याचाच असतो. परदेशी पर्यटनाच्या बाबतीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्यात १.३ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे, तर आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे, असे मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.