पणजी : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील निसर्ग, धबधबे, वनक्षत्र याकडे पर्यटकांना वळवण्यासाठी आणि स्थानिक महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यटन खात्यातर्फे इको टुरिझम योजना राबवली जाते. वन खात्याच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना अंतर्गत भागातील आकर्षक जागेकडे आकर्षित केले जाते.
दरवर्षी दूधसागर धबधब्यावर २ लाख ३६ हजार पर्यटक येतात. अशाच विविध धबधब्यांचा इको टुरिझम समावेश आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला खंवटे बोलत होते. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
पर्यटन खात्याने कुठल्या जागा इको टुरिझमसाठी नक्की केल्या आहेत, त्या जागांचा अभ्यास केला आहे का, कचऱ्याची समस्या कशी सोडवणार, पर्यावरण कसे सांभाळणार, असे विविध प्रश्न आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारले होते. त्यावर उपप्रश्न विचारताना आमदार वेंझी व्हिएगस यांनी गोव्यात ७ वंडर्स आहेत, त्यांचा इको टुरिझममध्ये समावेश करण्याची मागणी केली.
युरी आलेमाव यांनी इको टुरिझम धोरण तयार करण्याची मागणी केली. मंत्री खंवटे म्हणाले, बॉडला वन्यप्राणी अभयारण्य, तांबडी सुर्ला महादेव मंदिर, तसेच सांगे, सत्तरी, काणकोण या तालुक्यातील धबधबे, दूधसागर धबधबा आदी स्थानांचा इको टुरिझम मध्ये सामावेश करण्यात आला आहे.
पराग रांगणेकर सारख्या वन्य अभ्यासकाचा सल्ला घेऊनच ईको दुरिझमसाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगून सरकार आध्यात्मिक व आयुर्वेद पर्यटनाला प्राधान्य देत असल्यामुळे आयुर्वेदिक कॉलेज आणि इस्पितळाशी करार करून इको-टुरिझमच्या जागी आयुर्वेदिक उपचार उपलब्ध केले जात असल्याचे ते म्हणाले.
इको टुरिझम जागेमध्ये कचरा निर्माण झाल्यास तो पंचायतीच्या मदतीने काढला जातो. तसेच जे दुकानदार दुकाने थाटतात ते कचरा हटवतात. इको टुरिझम धोरणाबाबत सरकार निश्चितपणे विचार करणार आहे. आमदार व्हिएगस यांनी सुचवलेल्या सात वंडर्सचाही विचार करू, असे खंवटे म्हणाले.
राज्यात २०० होम स्टे
पर्यटकांना ग्रामीण भागात राहण्यासाठी होम स्टे योजना सुरू केली आहे. त्याला परवानगी देताना सर्व सुविधा तेथे उपलब्ध आहेत का याची पाहणी केली जाते. गोव्यात तब्बल २०० महिला स्वतःच्या घरामध्ये होम स्टेच्या माध्यमातून पर्यटकांना राहण्यास देतात आणि त्यातून आर्थिक स्वावलंबी झाल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले.