गोवा

GOA CARNIVAL : पर्यटक, व्यावसायिकांचे लक्ष कार्निव्हलकडे

मोनिका क्षीरसागर

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूची सर्वांत जास्त झळ ही पर्यटन क्षेत्रास बसली. मागील तीन वर्षांपासून या क्षेत्रात चढउतार पाहायला मिळत आहे. मध्यंतरी कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेचा फटका कळंगुट-कांदोळी येथील पर्यटन हबला बसला होता. पुढच्या महिन्यांत कार्निव्हलची (GOA CARNIVAL) धूम असेल, त्यावेळी काही प्रमाणात पर्यटकांची रेचलेच किनार्‍यावर असू शकते. सध्या किनार्‍यावर पर्यटकांची थोडीफार वर्दळ असली तरी, जी गर्दी डिसेंबर तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी दिसली तशी दिसून येत नाही. कांदोळीतील एका शॅक्स मालकाने सांगितले की, याआधीच कांदोळीमधील शॅक्स बंद झाले आहेत. सध्या ग्राहकांची संख्या रोढावली आहे. देशी पर्यटक येतात, परंतु ते फार मोठा खर्च करण्यास तयार नसतात.

शॅक मालक कल्याण सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले की, कोरोना महामारीचा आम्हा पर्यटक व्यावसायिकांना खूप मोठा फटका बसला. मध्यंतरी कोरोनाची तिसरी लाट येणार अशा बातम्या आल्याने व्यवसाय पूर्णतः ठप्प होता. त्यानंतर आचारसंहितेमुळे रात्री उशिरापर्यंत सर्व व्यवहार बंद होते. आता मतदान संपल्याने काहीप्रमाणात पुन्हा पर्यटन क्षेत्रास उभारी येईल, अशी आशा आहे.
पुढील महिन्यांत कार्निव्हल आहे. कार्निव्हल हा मौजमस्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळे पर्यटकांची (GOA CARNIVAL) रेचलेच पाहायला मिळेल. परंतु, हा सुपर सिझन नसेल, असेही लोबो म्हणाले. '

नवीन सरकारने पर्यटन व्यावसायिकांना किमान तीन वर्षांसाठी नूतनीकरण परवान्यात मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा आहे. तसे आम्ही मध्यंतरी राजकीय पक्षांकडे झालेल्या बैठकीत आम्ही हे मुद्दे व आमच्या समस्या व्यक्‍त केल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कोव्हिडमुळे मागील तीन वर्षांपासून, शॅक किंवा पर्यटनक्षेत्राशी निगडित व्यावसायिकांचे कबंरडेच मोडले आहे. दरवेळी आम्ही सरकारला संपूर्ण अबकारी परवाना शुल्कासोबत इतरही शुल्क भरतो. मात्र, अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो, असे शॅकधारकांचे म्हणणे आहे. टॅटू आर्टिस्ट कल्पेश म्हणाला की, सध्या अपेक्षित अशी गर्दी किनार्‍यावर दिसत नाही. मागील चार दिवस तर एकदम शुकशुकाटच होता.

पर्यटकांची पावले किनार्‍याकडे…

कळंगुट हा जगप्रसिद्ध समूद्र किनारा देशी पर्यटकांचे प्रचंड आकर्षण येथे परदेशी पर्यटकही (GOA CARNIVAL) असतात. देशी पर्यटकांची मात्र कायमचीच जत्रा असते. पर्यटकांचे लोंढेच लोंढे किनार्‍याकडे वाहत असतात. दिवसभर आणि रात्रीचे असे चित्र असते. विजेवरील रोषणाईचा झगमगाट असतो. खा प्या मजा करा, असा माहोल असतो. बहुतेक पर्यटक बेधुंद असतात. काहीजण किनार्‍यावरच झोपतात. त्यांना जाग येते ती सूर्याची किरणे अंगावर पडून तापू लागल्यानंतर. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटकांची येथे दरवर्षी किमान एकदातरी हमखास भेट असते. असा हा किनारा लवकरच पर्यटकांच्या जत्रेने पुन्हा फुलेल असे सध्याचे चित्र आहे. याचे कारण असे की, पर्यटकांची पावले पुन्हा या किनार्‍याकडे वळत आहेत. आनंदाची घटना म्हणजे कोरोनाची पावले आता घाबरण्यासारखी राहिलेली नाहीत. लवकरच कोरोना पूर्णपणे नाहिसा होण्याचीही शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT