Goa nightclub fire
पणजी: गोव्यातील हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान २५ जणांचा होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांसह ४ पर्यटक, १४ क्लबचे कामगार व इतर ७ जणांचा समावेश आहे. सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून गोव्यातील आगीच्या घटनेची माहिती घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून या दुर्घटनेची माहिती घेतली. "गोव्यातील आर्पोरा येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या सहानुभूती आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले आणि राज्य सरकार जखमींना सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग क्लबच्या वरील बाजूस लागली. या क्लबला बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने आगीनंतर क्लबमध्ये असलेल्या पर्यटक तसेच कामगारांना बाहेर पडणे कठीण बनले. त्यानंतर आतमध्ये असलेल्या पर्यटक तसेच कामगारांची मोठी धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने व अग्निशमन पाण्याचे बंब गाडी रस्ता अरुंद असल्याने घटनास्थळी पोहचण्यास वेळ गेला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली तरी २५ जणांचा मृत्यू झाला. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात शव चिकित्सेसाठी पाठवण्यात आले आहेत व त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील पाहणी केली व पत्रकारांशी बोलताना त्यानी सांगितले की या नाईट क्लबकडे आवश्यक असलेले परवाने तसेच त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे संबंधित नाईट क्लबच्या मालका विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. या नाईट क्लबला नियम धाब्यावर बसून जर परवाने देण्यात आले असतील तर संबंधिताविरुद्धही कारवाई केली जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली.
घटनास्थळी आमदार मायकल लोबो या नीही भेट दिली व तेथील आगीची पाहणी केली व ते म्हणाले की दोन वर्षांपूर्वी या भागात बेकायदेशीरपणे नाईट क्लब सुरू असल्याची माहिती देऊन त्याची चौकशी करावी व त्यांच्या परवान्यांची तपासणी करावी अशी आपण मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडतात असे ते म्हणाले.