पणजी : परप्रांतीय कामगार परतू लागल्याने या वर्षीचा मासेमारी हंगाम चार- पाच दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मांडवी फिशरमेन मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली. सद्यस्थितीत पणजीतील २५ टक्के, बेतुल व वास्कोतील ५० टक्के ट्रॉलर समुद्रात गेले आहेत, असेही धोंड यांनी सांगितले.
मासेमारी बंदी १ ऑगस्टला उठली असली, तरी या वर्षीचा हंगाम कामगारांची कमतरता, खराब हवामान यामुळे लांबला आहे. अजूनही समुद्रात वाऱ्याचे प्रमाण मोठे आहे. ज्यादिवशी वारा नसेल त्यादिवशी मासे अधिक मिळतात. ट्रॉलरवर काम करणारे कामगार आपल्या मूळ गावी गेले होते. मात्र पाऊस उशिरा पडल्याने त्यांची शेतीची कामे लांबली होती. अलीकडे पाऊस व्यवस्थित पडल्याने शेतीची कामे आटोपून ते गोव्यात परतत आहेत. त्यामुळे आता किनाऱ्यावरील ट्रॉलर समुद्रात लोटले जात आहेत.
बुधवार, दि. २६ रोजी पणजी मासळी बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरमई (इसवण) आवक होती. दरही ५०० ते ५५० रुपये किलो होता. त्याबद्दल विचारल्यावर धोंड म्हणाले, समुद्र शांत होता. वाऱ्याचा वेग कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर सुरमई मिळाली. मात्र श्रावणामुळे मागणी कमी असल्याने दर कमी होता. साधारणपणे गणेश चतुर्थीपर्यंत माशांचे दर कमी राहतील.
एलईडी मासेमारी नोव्हेंबर-डिसेंबरपासून
सध्या किनाऱ्यापासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणावर मासे मिळत आहेत. त्यामुळे एलईडी मासेमारी शून्य टक्के आहे. मासे खोल समुद्रात गेल्यावर त्यांना वर आणण्यासाठी एलईडीचा वापर केला जातो. मात्र तो काळ नोव्हेंबर, डिसेंबरचा किंवा त्यानंतरचा असू शकतो, सध्या एलईडीचा वापर करणे मत्स्यप्रजातींसाठी योग्य नाही, असे धोंड यांनी सांगितले.
सध्या खोल समुद्रात मासेमारी नाही
नुकताच माशांचा पुनरुत्पादन काळ संपला आहे. हवामान चांगले असल्यास किनाऱ्यापासून काही अंतरावर बंपर मासळी मिळू शकते. त्यामुळे खोल समुद्रात जाण्याची गरज पडत नसल्याने एलईडी मासेमारी होत नाही.