Traditional Fishermen Goa Issues
मडगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.१३) गोवा दौऱ्यादरम्यान सासष्टी तालुक्यातील बाणावली समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पारंपरिक मच्छीमार प्रतिनिधी 'पेले' यांच्याशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या अडचणी, मागण्या आणि व्यवसायासमोरील आव्हानांचा आढावा घेतला. मच्छीमारांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
या भेटीदरम्यान पेले यांनी महाराष्ट्र, विशेषत: मुंबईतून मोठ्या प्रमाणावर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे गेल्या वर्षभरात पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायाला मोठा आधार मिळाल्याचे सांगितले. पर्यटनामुळे मासळी विक्रीत वाढ झाली असून अनेक मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेला त्याचा फायदा झाल्याचे त्यांनी नमूद करत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी पेले यांनी केंद्र सरकारने पारंपरिक मच्छीमारांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. तसेच भविष्यात कोणतेही नवे धोरण किंवा नियम लागू करताना पारंपरिक मच्छीमारांच्या हक्कांवर गदा येणार नाही आणि त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण होईल, याची खबरदारी घेण्याची विनंतीही त्यांनी केली.
पेले यांच्या मागण्या लक्षपूर्वक ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा विषय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडून सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन दिले. गोव्यातील पारंपरिक मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाणावली किनारपट्टीवरील या भेटीत पर्यटन, पारंपरिक मासेमारी व्यवसाय, स्थानिक मच्छीमारांसमोरील विविध अडचणी आणि त्यांच्या उपजीविकेशी संबंधित प्रश्नांवरही चर्चा झाली. महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील पर्यटनवाढीमुळे दोन्ही राज्यांतील आर्थिक तसेच सामाजिक संबंध अधिक बळकट होत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.